शूरा आम्ही वंदिले : झेंडा रोविला बांगलादेशी, कॅप्टन विश्वनाथ कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 07:00 AM2018-08-14T07:00:00+5:302018-08-14T07:00:00+5:30

नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या कॅप्टन कुलकर्णी यांना बांगलादेशात हजर होण्याचा आदेश आला. पत्नी रेवाताई यांनी त्यांना निरोप दिला.

Shura We Vandilay: Zenda Rowla Banglalidei, Capt Vishwanath Kulkarni | शूरा आम्ही वंदिले : झेंडा रोविला बांगलादेशी, कॅप्टन विश्वनाथ कुलकर्णी

शूरा आम्ही वंदिले : झेंडा रोविला बांगलादेशी, कॅप्टन विश्वनाथ कुलकर्णी

Next

नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या कॅप्टन कुलकर्णी यांना बांगलादेशात हजर होण्याचा आदेश आला. पत्नी रेवाताई यांनी त्यांना निरोप दिला. बांगलादेश मुक्ती लढ्यात तेथील स्थानिक नागरिकांची मुक्तीफौज उभी करण्यात भारतीय सैन्याचा छुपा वाटा होता. या घडामोडींमध्ये कॅप्टन कुलकर्णी यांचेही मोठे योगदान होते. पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करल्यानंतर भारतीय सैनिक थोडे गाफिल होणे स्वाभाविक होते. मात्र, कॅप्टन कुलकर्णी यांनी तसे होऊ दिले नाही. त्यामुळेच शिरोमणी गावात बंकरमध्ये लपून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांचा शोध त्यांना लागला. भारतीय सैनिक आपण बंकरवर हल्ला करू व सर्व पाकिस्तान्यांना मारून टाकू असा आग्रह धरत होते. मात्र, शौर्य व धाडस याबरोबरच संयमीपणा हा सुध्दा नेतृत्वाचा मोठा गुण असतो. कॅप्टन कुलकर्णी यांच्यात तो होता. त्यामुळे त्यांनी जिवावर बेतण्याचा धोका असूनही संयमाने परिस्थिती हाताळली.
सावेडीत नगर-मनमाड रोडवर माउली संकुलासमोर ‘गुलमोहोर’ बंगला म्हणजे कॅप्टन विश्वनाथ कुलकर्णी यांचे निवासस्थान. या बंगल्यात भिंतीवर कॅप्टन विश्वनाथ कुलकर्णी यांचा लष्करी शिस्तीतील रुबाबदार फोटो पाहिला की आपण आपोआप नतमस्तक होतो. वीरपत्नी रेवाताई कुलकर्णी यांचे पांढऱ्या साडीतील व्यक्तिमत्त्व राष्ट्रभक्ती, त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक.
विश्वनाथ तथा राजाभाऊ वासुदेव कुलकर्णी यांचा जन्म ३१ आॅक्टोबर १९३७ रोजी नगर येथे झाला. प्राथमिक शिक्षण शेवगाव येथे तर माध्यमिक शिक्षण हिंद सेवा मंडळाच्या तत्कालीन मॉडेल हायस्कूलमध्ये झाले. पुढे त्यांनी अहमदनगर कॉलेजमधून अर्थशास्त्रातून पदवी संपादन केली. नगर कॉलेजमध्ये त्यांनी ‘एनसीसी’मध्ये सहभाग घेतला. परिश्रमाच्या बळावर ते बेस्ट कॅडेट ठरले.
सुरूवातीची काही वर्षे त्यांनी फिजिकल डायरेक्टरची नोकरी केली. पण एनसीसीतील सहभागामुळे त्यांना लष्करी सेवेचे आकर्षण निर्माण झाले व एनसीसीमुळेच ते थेट लष्करात दाखल झाले. ते साल होते १९६४, त्यानंतर लगेचच १९६५ चे भारत पाक युद्ध झाले. त्यात त्यांना थोडा अनुभव मिळाला. तो त्यांना पुढे बांगला देश मुक्ती संग्रामात झालेल्या भारत पाक युद्धात उपयोगी पडला.
लष्करी सेवेचा सर्वात जास्त काळ त्यांनी गोरखपूर येथे घालविला. गोरखपूर येथे वायुसेनेबरोबर काम करण्यासाठी आर्मीचे एक युनिट तैनात होते. त्या युनिटमध्ये कुलकर्णी यांची नियुक्ती झाली. वायुसेनेला माहिती देण्यासाठी त्यावेळी जमशेदपूर युनिट कार्यरत होते. ‘६७ फिल्ड रेजिमेंट’ हे त्यांच्या युनिटचे नाव. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी हे युनिट काम करायचे. याचवेळी मेजर बनण्यासाठी ते परीक्षेची तयारी करीत होते. त्यासाठी त्यांनी रजा घेतली होती. मात्र भारत-पाकिस्तान युद्ध घोषित झाले आणि ऐनवेळी रजा रद्द करून ते देशसेवेसाठी युद्धभूमिवर लढण्यासाठी सज्ज झाले.

१४ आॅक्टोबर १९७१ रोजी ते देवळाली (नाशिक) येथून युद्धभूमीसाठी रवाना झाले. त्याचवेळी त्यांचे प्रत्यक्ष झालेले हे दर्शन रेवाताई यांच्यासाठी शेवटचे ठरले. बांगला देश मुक्ती संग्रामात त्या देशाची मुक्ती संघटना उभी करण्यात भारतीय लष्कराचा छुपा सहभाग होता. त्यात राजाभाऊंचेही योगदान होते. कॅप्टन म्हणून त्यांच्याकडे एक तुकडी होती. या तुकडीसह त्या सैन्याचे नेतृत्व कर्नल सक्सेना यांच्याकडे होते. १६ दिवस हे युद्ध चालले. त्यानंतर पाकिस्तानने बिनश र्त शरणागती पत्करली. या शरणागतीचाच कार्यक्रम सुरू होता. कॅप्टन कुलकर्णी शिरोमणी नावाच्या गावात होते. तिथे लपलेल्या पाकिस्तानी सैन्याला आपल्या देशाने शरणागती पत्करली हे माहितीच नव्हते.  ते शरण यायला तयार नव्हतेच, शिवाय गोळीबार करून भारतीय सैन्याला आव्हान देत होते. शरण येत नसलेल्या व लपून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करू असे त्यांचे सैनिक सांगत होते, मात्र  शरणागताला मारू नये या भारतीय विचारांचा आदर करत कॅप्टन कुलकर्णी यांनी त्याला नकार दिला. ध्वनिवर्धक मागवले. त्यावरून लपलेल्या  सैनिकांना त्यांचा देश शरण आल्याचे सांगितले. आपल्या सैन्याची संख्या सांगितली. तुम्ही लढत राहिलात तर विनाकारण मनुष्यहानी होईल, त्यामुळे वेडेपणा करू नका, शरण या असे आवाहनही केले. बंकरमध्ये लपून बसलेल्या पाकिस्तानी सैन्याने ते मान्य केले. एक एक सैनिक हात मागे बांधून पुढे येऊ लागला. त्याचे नाव नोंद करून, त्याच्याजवळचे शस्त्र काढून घेऊन भारतीय सैनिक त्याला जमा करून घेत होते. शांतपणे हे करत असलेल्या भारतीय सैन्याला पाकिस्तानी सैनिकांच्या मानसिकतेचा अंदाज आला नाही.
कॅप्टन कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली हा शरणागतीचा कार्यक्रम सुरू होता. ते बेसावध होते. अचानक त्या बंकरमधून अनेक सैनिक आले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. एका सैनिकाच्या लाईट मशीनगनमधील अनेक गोळ्या कॅप्टन कुलकर्णी यांच्या शरीरावर बरसल्या.
या हल्ल्याने भारतीय सैन्य गांगरून गेले. पण क्षणभरच. लगेचच त्यांनीही प्रतिकार सुरू केला. त्याही स्थितीत शरीराला गोळ्या लागलेल्या आपल्या कॅप्टनला तिथून हलवण्यासाठी जवान पुढे आले, मात्र कॅप्टन कुलकर्णी यांनी त्यांना मी ठीक आहे, तुम्ही त्यांच्याकडे पहा असे सांगितले. त्यांच्या या धीरोदात्तपणाला सैनिकांनी सलाम केला. उर्वरित पाकिस्तानी सैन्याला यमसदनी पाठवले. कॅप्टन कुलकर्णी यांनी ते पाहतानाच देह ठेवला. अहमदनगरचा सुपुत्र भारतमातेच्या रक्षणार्थ कामी आला. शहीद झाला. रेवातार्इंना हा सगळा इतिहास तोंडपाठ आहे. बांगलादेशातील शिरोमणी या गावात कॅप्टन कुलकर्णी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नल सक्सेना यांनी त्यांना अग्नी दिला.  लष्करातील चार जवानांनी नगरमध्ये आणलेला त्यांचा अस्थिकलश पाहून अहमदनगर हळहळले. या वीरपुत्राला त्यांनी सलाम केला. आई, वडील, पत्नी रेवा, दिनुभाऊ कुलकर्णी (भाऊ), मोठी नऊ वर्षांची मुलगी संगीता आणि सहा वर्षांचा मुलगा शिरीष असा परिवार मागे ठेवून विश्वनाथ भारतमातेच्या कुशीत विसावले. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, लष्कराच्या अनेक ज्येष्ठ अधिकाºयांनी अहमदनगरला येऊन कुलकर्णी कुटुंबीयांचे सांत्वन केले. बांगलादेशातील शिरोमणी येथे कॅप्टन कुलकर्णी यांचे स्मारक आहे. या स्मारकाला कुलकर्णी कुटुंबीयांनी भेट दिली. तिथेच एका मार्केटला कॅप्टन कुलकर्णी यांचे नाव देण्यात आले आहे. नगरकरांनीही त्यांच्या निवासस्थानासमोरच्या रस्त्याला त्यांचे नाव देऊन नगरच्या या वीरपुत्राचे स्मरण कायम ताजे ठेवले आहे. मुंबई-कांदिवली येथे त्यांनी फिजिकल एज्युकेशनमधील पदवी मिळविली आणि मुंबईमध्ये विल्सन कॉलेजात फिजिकल डायरेक्टरची एक वर्ष नोकरी केली. एनसीसीमध्ये असतानाच त्यांना लष्करी शिक्षणाची आवड निर्माण झाली होती. त्यामुळे फिजिकल डायरेक्टर म्हणून नोकरी करताना त्यांचे मन नोकरीत रमले नाही. एनसीसीमध्ये ते विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने त्यांना थेट लष्करात भरती होण्याची संधी मिळाली. मुलाखत दिली आणि ते थेट लष्करात भरती झाले.लष्करी सेवेचा सर्वात जास्त काळ त्यांनी गोरखपूर येथे घालविला. गोरखपूर येथे वायुसेनेबरोबर काम करण्यासाठी आर्मीचे एक युनिट तैनात होते. त्या युनिटमध्ये कुलकर्णी यांची नियुक्ती झाली. वायुसेनेला माहिती देण्यासाठी त्यावेळी जमशेदपूर युनिट कार्यरत होते. ‘६७ फिल्ड रेजीमेंट’ हे त्यांच्या युनिटचे नाव. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी हे युनिट काम करायचे. याचवेळी मेजर बनण्यासाठी ते परीक्षेची तयारी करीत होते. त्यासाठी त्यांनी रजा घेतली होती. मात्र भारत-पाकिस्तान युद्ध घोषित झाले आणि ऐनवेळी रजा रद्द करून ते देशसेवेसाठी युद्धभूमीवर लढण्यासाठी सज्ज झाले. १४ आॅक्टोबर १९७१ रोजी ते देवळालीतून युद्धभूमीसाठी रवाना झाले. त्याचवेळी त्यांचे प्रत्यक्ष झालेले हे दर्शन रेवाताई यांच्यासाठी शेवटचे ठरले. गोरखपूर येथील त्यांची कारकीर्द ही शेवटची. याच काळात रेवाताई त्यांच्यासमवेत साडेचार वर्षे वास्तव्यास होत्या. हाच त्यांचा व रेवाताई यांचा शेवटचा सहवास. 

कॅप्टन विश्वनाथ वासुदेव कुलकर्णी
जन्मतारीख ३१ आॅक्टोबर १९३७
सैन्यभरती सन १९६४
वीरगती १६ डिसेंबर १९७१
सैन्यसेवा ६ वर्षे
वीरपत्नी रेवाताई कुलकर्णी

 शब्दांकन : सुदाम देशमुख

 

Web Title: Shura We Vandilay: Zenda Rowla Banglalidei, Capt Vishwanath Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.