कोविडच्या संकटात साई संस्थानने माणुसकी जपली : उद्धव ठाकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 06:55 PM2021-05-18T18:55:08+5:302021-05-18T18:56:01+5:30

कोविडच्या संकटात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प व आरटीपीसीआर लॅबची निर्मिती करून साई संस्थानने माणुसकीची शिकवण जपतानाच राज्यातील इतर संस्थांसमोर आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई संस्थानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

Sai Sansthan saves humanity in Kovid crisis: Uddhav Thackeray | कोविडच्या संकटात साई संस्थानने माणुसकी जपली : उद्धव ठाकरे 

कोविडच्या संकटात साई संस्थानने माणुसकी जपली : उद्धव ठाकरे 

googlenewsNext

शिर्डी : कोविडच्या संकटात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प व आरटीपीसीआर लॅबची निर्मिती करून साई संस्थानने माणुसकीची शिकवण जपतानाच राज्यातील इतर संस्थांसमोर आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई संस्थानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

साईभक्तांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, तर आरटीपीसीआर लॅबचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाइन लोकार्पण केले.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, देणगीदार के. व्ही. रमणी, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची ऑनलाइन, तर खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे, संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे, डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, बाबासाहेब घोरपडे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, कमलाकर कोते, अभियंता रघुनाथ आहेर, डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे आदी सभागृहात उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, मंदिर बंद असले तरी वैद्यकीय, स्वच्छता कर्मचारी, पोलीस अखंड सेवा देत आहेत. संकटकाळात देणगीदारांच्या मदतीने ऑक्सिजन निर्मितीसारखे प्रकल्प उभे राहात आहेत. जीव वाचवणारे हे कार्य भाविकांसाठी श्रद्धेची फलश्रुती असून, देव सोबत असल्याचाच अनुभव आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सज्जता केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे.

अजित पवार म्हणाले, साई संस्थानकडून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली जाते. ऑक्सिजन तुटवडा असल्याने उद्योगांसाठी लागणारी ऑक्सिजन निर्मिती कमी करून मेडिकल ऑक्सिजन निर्मितीला प्राधान्य दिले आहे. संस्थानचे सीईओ बगाटे यांनी प्रास्ताविका केले. डेप्युटी सीईओ ठाकरे यांनी आभार मानले.

ऑक्सिजन प्लांटसाठी रिलायन्स फाउण्डेशनने एक कोटी ८९ लाखांचे सयंत्र, साईभक्त रमणी यांनी शेड व सिव्हिल वर्कसाठी साडे ४४ लक्ष तर पाइपलाइनसाठी प्रथम फाउण्डेशनने दहा लाखांची देणगी दिली, या प्लांटमधून तीनशे बेडसाठी चोवीस तास ऑक्सिजन उपलब्ध होईल. आरटीपीसीआर लॅबमध्ये प्रतिदिनी दीड हजार तपासण्या होऊ शकतील.

Web Title: Sai Sansthan saves humanity in Kovid crisis: Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.