मुंबई - अहमदनगर जिल्ह्याचे "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर" असं नामांतर करा अशी मागणी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संदर्भात पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे.
"राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानच्या प्रेरणास्थान आहेत. कुशल प्रशासन आणि आदर्श न्यायव्यवस्थेच्या जोरावर त्यांनी रयतेच्या जगण्यात खऱ्या अर्थाने राम आणला. अशा या महान व प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं माहेर (जन्म स्थान) अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आहे" असं भूषणसिंह राजे होळकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
"महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण हिंदूस्थानाला नवीन दिशा दिली. देशाला अखंडीत ठेवलं. त्यांच्या महान स्मृतींपुढे नतमस्तक होऊन अहिल्यादेवींवर निष्ठा असणाऱ्यांच्या लोकभावनेचा सन्मान ठेवत अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असं तातडीने नामांतर करावं ही नम्र विनंती. शेवटी आपण कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार? जुलमी राजवटीचा की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा? हे महाराष्ट्राततील जनतेने ठरवलं आहे. आता निर्णय तुमचा आहे" असं देखील भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्य़मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.