श्रीगोंदा : तालुक्यात ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ८८.२६ टक्के मतदान झाले. मतदानाची विक्रमी टक्केवारी पाहता धक्कादायक व काठावरचे निकाल लागणार आहेत. त्यामुळे कोण जिंकणार, कोण हरणार, यावर विविध प्रकारचा सट्टा (पैजा) लागल्या आहेत. अनेक दिग्गजांची धाकधूकही वाढली आहे.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रंगत नव्हती. सरपंचपद आरक्षण नंतर निघणार असल्याने अनेक ठिकाणच्या पॅनलप्रमुखांनी खर्च विभागला. त्यामुळे इतरांवरही खर्चाचा भार आला. अशा परिस्थितीत १ हजार ९७ उमेदवार शेवटच्या टप्प्यात आक्रमक झाले. त्यांनी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब केला. त्यामुळे मतदानाचा भाव चार अंकाच्या घरात गेला. काही ठिकाणी दर पाच अंकी झाला होता. मतदारांनी आलेली ‘लक्ष्मी’ नाकारली नाही. अशा परिस्थितीत मतदारराजा कुणाला प्रसन्न होतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. काही ठिकाणी महिलांना पैठणी भेट दिल्याचीही चर्चा आहे. दिग्गज उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला आहे. वेळप्रसंगी सावकाराचे कर्जही काढले. यंदा जवळपास सर्वच गावात मतदानाचा टक्का वाढला. त्यामुळे त्या दिग्गजांचीही धाकधूक वाढली आहे.