आंदोलनाचा इशारा देताच महावितरणला जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:15 AM2021-06-19T04:15:33+5:302021-06-19T04:15:33+5:30
कर्जत : तालुक्यातील माळवाडी, रेहकुरी, बिटकेवाडी या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून वीज वाहिनी व रोहित्र दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी ...
कर्जत : तालुक्यातील माळवाडी, रेहकुरी, बिटकेवाडी या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून वीज वाहिनी व रोहित्र दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागली. या संदर्भात भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांनी आंदोलन करण्याचा इशारा देताच महावितरणने संबंधित कामे पूर्ण केली.
माळेवाडी, रेहकुरी, बिटकेवाडी या भागातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नवीन वीज वाहिनी टाकून त्यावर रोहित्र बसविणे ही कामे करण्यासाठी एजन्सी नेमल्या होत्या. त्यांनी कामे पूर्ण केली होती. मात्र कामे झाल्यावर वर्षभरात तारा तुटणे, खांब पडणे, वाकणे असे प्रकार झाले होते. यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. ही कामे पूर्ण करण्यात यावीत यासाठी या भागातील शेतकरी महावितरण कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे मारत होते. मात्र केवळ होकाराशिवाय शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांच्याकडे हा प्रश्न मांडला.
सुनील यादव यांनी महावितरणचे अधिकारी यांची भेट घेऊन या प्रलंबित कामात लक्ष घालण्याची विनंती केली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावर महावितरणचे अधिकाऱ्यांनीही ही कामे करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या ठेकेदारांना या कामात दिरंगाई व हलगर्जीपणा केल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत.
---
महावितरण कंपनीने या भागातील कामे पूर्ण करण्यासाठी ऑफशर व वेवलाईन या कंपनीला काम दिले होते. ती त्यांनी वेळेत पूर्ण केली नाहीत. तसेच मुदतीत देखभाल केली नाही. यामुळे संबंधित ठेकेदार कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. या कंपनीवर कारवाई करण्यात येईल.
-अशोक घुले,
उप कार्यकारी अभियंता, महावितरण, कर्जत