कोपरगाव तालुका पहिल्या दिवशी निरंक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:19 AM2020-12-24T04:19:05+5:302020-12-24T04:19:05+5:30
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी (दि.२३) सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्या दिवशी एकही ...
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी (दि.२३) सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्या दिवशी एकही उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयाकडे फिरकला नाही. त्यामुळे उमेदवारी अर्जासाठी पहिला दिवस निरंक ठरला आहे.
कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर, सांगवी भुसार, उक्कडगाव, तिळवणी, घारी, रवंदे, ओगदी, अंचलगाव, सोनारी, हिंगणी, वेळापूर, देर्डे चांदवड, येसगाव, मढी बुद्रुक, मढी खुर्द, आपेगाव, नाटेगाव, कोळगाव थडी, मळेगाव थडी, मायगाव देवी, मनेगाव, काकडी, जेऊर कुंभारी, धोंडेवाडी, अंजनापूर कोकमठाण, कासली, टाकळी, जेऊर पाटोदा यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत आहे. परंतु, पहिल्या दिवशी वरील २९ गावांतील एकाही उमेदवाराने आपला अर्ज भरलेला नाही.
तालुक्यात कोल्हे, काळे, परजणे यांच्याकडे साखर कारखाने, दूध संघ यांची स्वतंत्र यंत्रणा असल्यामुळे ते तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपापल्या गटाच्या उमेदवारांचे याच यंत्रणेमार्फत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून उमेदवारी अर्ज भरीत असतात. तालुक्यातील वरील मातब्बरांच्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर उमेदवारांचे अर्ज कमी असतात. पहिल्या दिवशी अशाच अपक्ष उमेदवारापैकीच उमेदवारी अर्ज दाखल होतील, असा अंदाज होता. त्यामुळे निदान निवडणूक प्रक्रियेतील अर्ज स्वीकारण्याचे खाते तरी उघडेल अशी आशा होती; परंतु पहिल्या दिवशी एकही अर्ज न आल्याने तेही फोल ठरले आहे. त्यामुळे आजचा दुसरा दिवस व या आठवड्यातील शेवटचा दिवस असल्याने किती अर्ज दाखल होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.