अहमदनगर : जामखेडला आज कृषी महाविद्यालयाचे उद््घाटन केले असले, तरी श्रीगोंदा तालुक्यातही लवकरच कृषी महाविद्यालय होणार आहे, त्यामुळे कोणी वाद घालू नये, असे सांगतानाच कुकडीचा पाणीप्रश्नही सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.हाळगाव (ता. जामखेड) येथे सोमवारी झालेल्या कृषी महाविद्यालयाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंधारणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा आदी उपस्थित होते.आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंद्यात कृषी महाविद्यालय होण्यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु पालकमंत्र्यांनी हे महाविद्यालय आपल्या मतदारसंघात कर्जत येथे नेल्याने पाचपुते नाराज होते. त्यांनी त्याला न्यायालयात आव्हानही दिले होते. हाच धागा पकडून जामखेडप्रमाणे श्रीगोंद्यातही कृषी महाविद्यालय होणार असल्याने कोणी वाद करू नये, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री शिंदे व पाचपुते यांच्यात समझोता घडवला.कुकडीचा पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. निळवंडे धरण व कालव्यांसाठी ५०० कोटी देणार आहे. त्याचाही मंत्रालयात लवकरच निर्णय होईल. जामखेड नगरपालिकेसाठी १२५ कोटींच्या निधीची मागणी पालकमंत्र्यांनी केली आहे, तो निधी लवकरच मिळेल. जामखेडला होणाºया भारत बटालियनच्या (एनसीसी सेंटर) प्रस्तावात त्रुटी आहेत, त्या दुरूस्ती करून पाठवा, त्यालाही मंजुरी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
जामखेडप्रमाणे श्रीगोंद्यालाही कृषी महाविद्यालय होणार असल्याने कोणी वाद घालू नये : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 3:02 PM