जायकवाडीच्या फुगवट्याचे पाणी पिकात; घरातही शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:43 PM2019-11-10T12:43:36+5:302019-11-10T12:44:12+5:30

जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून फुगवट्याचे पाणी दहिगावने, भावीनिमगाव, ढोरसडे, हिंगणगाव आदी परिसरातील शेतातील उभ्या पिकांमध्ये घुसले आहे.

Jaikwadi inflatable water crop; Water also entered the house | जायकवाडीच्या फुगवट्याचे पाणी पिकात; घरातही शिरले पाणी

जायकवाडीच्या फुगवट्याचे पाणी पिकात; घरातही शिरले पाणी

googlenewsNext

नानासाहेब चेडे । 
दहिगावने : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून फुगवट्याचे पाणी दहिगावने, भावीनिमगाव, ढोरसडे, हिंगणगाव आदी परिसरातील शेतातील उभ्या पिकांमध्ये घुसले आहे. काही घरांमध्येही पाणी शिरले आहे.
जायकवाडी धरणाची उभारणी झाली आणि नगर जिल्ह्यातील काही भागासह मराठवाड्यातील जवळपास पाच जिल्ह्यांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीला हक्काचे पाणी मिळाले. यंदा धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविल्याने ‘बॅक वॉटर’चा भाग असलेल्या शेवगाव तालुक्यातील दहिगावने, ढोरसडे, भावीनिमगाव येथील शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. येथील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जायकवाडी प्रशासन धरणात क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा ठेवत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, असे येथील शेतकरी म्हणतात. धरणाच्या निर्मितीसाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यातील अनेकांचे पुनर्वसन न झाल्याने वाडी, वस्तीवरील लोक पाण्याच्या विळख्यात अडकले आहेत.
अधिकाºयांतील समन्वयाअभावी पुनर्वसन अजूनही रखडले आहे. योग्य पुनर्वसन होऊ न शकल्याचे कटू सत्य आहे. ग्रामस्थांना धरणाचे पाणी अस्वस्थ करत आहे. सुमारे वीस वर्षांपासून त्यांचा पुनर्वसनासाठीचा लढा सुरू आहे. येथील लोकप्रतिनिधींनींही या प्रश्नांच्या संदर्भात मंत्रालयात बैठका लावल्या. मात्र कोणताही निर्णय न झाल्याने अद्यापही पुनर्वसनाचे घोंगडे भिजतच राहिले. 
जायकवाडी धरणात जास्त पाणी साठल्यामुळे पिके हातून गेली आहेत. शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
संपादित झालेली जमीन सोडून ४२ गुंठे जमीन शिल्लक आहे. पैकी १० गुंठे क्षेत्रात जायकवाडीचे पाणी आल्याने पीक सडून गेले. उर्वरित संपूर्ण पिकाचे ओलाव्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात जाण्यासाठी छातीइतक्या पाण्यातून जावे लागते. ही सर्व परिस्थिती माजी मंत्री सुभाष देशमुख व चंद्रकांत पाटील यांना भेटून सांगितली. मात्र आश्वसनाव्यतिरिक्त काहीच पदरी पडले नाही, असे भावीनिमगावचे शेतकरी धरणग्रस्त शेतकरी अनंता व्यवहारे यांनी सांगितले. 
जायकवाडी धरणातील पाणी पातळी कमी करण्यासाठी तेथील अभियंत्यांशी चर्चा करणार आहे. त्या भागातील नुकसानग्रस्त पिकांची शेतक-यांना भरपाई मिळण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांनी सांगितले.  
 

Web Title: Jaikwadi inflatable water crop; Water also entered the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.