अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दहा अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.या अंगणवाड्यांना स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.जिल्ह्यात महिला आणि बालकल्याण विभागाच्यावतीने सातत्यपूर्ण काम करणाऱ्या आणि कुपोषणमुक्त असणाऱ्या जिल्ह्यातील ४० अंगणवाड्यांची नावे आणि माहिती आयएसओ मानांकनासाठी पाठविली होती. त्यापैकी दहा अंगणवाड्यांची या मानांकनासाठी निवड झाली आहे. या अंगणवाड्यात अनौपचारिक शिक्षणामुळे मुलांच्या उपस्थितीची सरासरी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची विविध उपक्रम उत्तम प्रकारे लोकसहभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. या ठिकाणी शौचालय, पिण्याचे शुध्द पाणी, उत्तम बैठक व्यवस्था, खेळण्यासाठी खेळणी आणि मैदान यांचा समावेश आहे. या अंगणवाड्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, महिला बालकल्याण सभापती हर्षदा काकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)
दहा अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन
By admin | Published: August 16, 2014 11:53 PM