भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस
By admin | Published: July 18, 2014 01:15 AM2014-07-18T01:15:24+5:302014-07-18T01:39:26+5:30
राजूर : भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे सातत्य टिकून असून, पावसाचा जोरही वाढला आहे.
राजूर : भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे सातत्य टिकून असून, पावसाचा जोरही वाढला आहे. रतनवाडी येथे या मोसमातील सर्वाधिक म्हणजेच साडेसात इंच, तर घाटघर येथे पावणेसहा इंच पावसाची नोंद झाली.
मंगळवारपासून मुळा, भंडारदराच्या खोऱ्यात पावसाने विश्रांतीनंतर पुन्हा आगमन केले. मागील आठवड्यातही घाटघरला १४८ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र त्यानंतर सलग तीन दिवस पाऊस कमी होत गेला. मात्र मंगळवारपासून पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला. त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओल्याचिंब झाल्या असून, गिरी शिखरावरून धबधबेही कोसळू लागले आहेत.
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर या परिसराला साजेशा पावसाची नोंद सकाळी संपलेल्या चोवीस तासांत झाली. त्यामुळे भंडारदरा धरणातील पाण्याची आवकही झपाट्याने वाढत आहे. सकाळी संपलेल्या चोवीस तासात३१० दलघफू नवीन पाणी आले. त्यामुळे आता भंडारदरा धरणाने एक टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी धरणातील पाणीसाठा १ हजार २० दलघफू होता.
हरिश्चंद्र गडाच्या पर्वतरांगातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुळा नदीचा विसर्ग वाढून २ हजार ६३५ क्युसेक झाला. रतनवाडी ५७८, घाटघर ७८९, भंडारदरा १९०, पांजरे ३१८, तरवाकी १३७.राजूर, कोतूळ, अकोले व आढळा परिसरात मात्र अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)
गुरुवारच्या बारा तासात भंडारदरा येथे ३३ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणात २२३ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे एकूण साठा १२१९ दलघफूटापर्यंत पोहचला. धरणातून ५५६ क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्यामुळे निळवंडे धरणातील पाणी साठा ४०४ दलघफू होता.