श्रीरामपुरात शेती, पाणी प्रश्नावरच निवडणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:44 PM2019-10-16T12:44:46+5:302019-10-16T12:45:50+5:30

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक उत्तरार्धात मात्र चुरशीची बनली आहे. शेती व पाणी प्रश्न या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्याच मुद्यावर काँग्रेस आघाडी व शिवसेना-मित्र पक्षाकडून एकमेकांवर तोफा डागल्या जात आहेत.

Elections on the question of agriculture, water in Shrirampur | श्रीरामपुरात शेती, पाणी प्रश्नावरच निवडणूक 

श्रीरामपुरात शेती, पाणी प्रश्नावरच निवडणूक 

Next

श्रीरामपूर विधानसभा - शिवाजी पवार । 
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक उत्तरार्धात मात्र चुरशीची बनली आहे. शेती व पाणी प्रश्न या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्याच मुद्यावर काँग्रेस आघाडी व शिवसेना-मित्र पक्षाकडून एकमेकांवर तोफा डागल्या जात आहेत.
मतदारसंघात श्रीरामपूरसह राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरासह ३२ गावांचा समावेश होतो. काँग्रेसच्या लहू कानडे यांच्यासाठी उपनगराध्यक्ष करण ससाणे समर्थकांनी मोट बांधली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांचे पदाधिकारीही सक्रिय आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळे यांची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी स्वीकारली आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे यांनी येथे दहाहून अधिक दौरे केले. त्यांनी मतदारसंघात तळ ठोकल्याने निवडणूक हायप्रोफाईल बनली आहे. गेली वीस वर्षे दिवंगत जयंत ससाणे व विखे यांच्यात आघाडी राहिली. ती आता तुटली आहे. विखे व मुरकुटे अशी नवी युती जन्माला आली आहे.
शिवसेना व भाजप येथे सन १९९० च्या दरम्यान अवघ्या ५ ते १० हजार मतांपुरती मर्यादित होती. मात्र मागील निवडणुकीत भाजपने ४५ तर सेनेने तब्बल ४० हजार मतांपर्यंतची मजल गाठली. ग्रामपंचायती, सेवा संस्था व सहकाराच्या परिघाबाहेरील नवीन कार्यकर्ते सेना-भाजपने जोडले. श्रीरामपूर शहरात त्यांची चांगली राजकीय ताकद आहे. देवळाली प्रवरा येथे चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर एकहाती सत्ता आहे.  दुसरीकडे काँग्रेसला मानणारा सर्वच थरातील वर्ग आहे. त्यामुळेच मोदी लाटेतही गतवेळी काँग्रेसने येथे बाजी मारली. सलग २० वर्षे पक्षाने येथे झेंडा रोवला. याखेपेलाही संगमनेरनंतर काँग्रेसला श्रीरामपुरातूनच अपेक्षा आहेत.
माजी आमदार मुरकुटे यांच्या राजकीय खेळीतूनच कांबळेंना सेनेची उमेदवारी मिळाली. त्यात मंत्री विखे यांनी सर्वच नेत्यांना एका छताखाली आणले. विखे यांनी अंतिम टप्प्यात चमत्कार करण्याचे भाकित केले आहे. मात्र काँग्रेसकडूनही तितक्याच आक्रमकतेने प्रचार सुरू आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भाऊसाहेब पगारे, एमआयएम पक्षाकडून सुरेश जगधने, निवृत्त शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हेदेखील रिंगणात आहेत. चुरशीच्या लढतीत ही मते निर्णायक ठरतील. अपक्ष व इतर उमेदवारांना उतरविण्यामागे खेळी असल्याचीही चर्चा रंगते आहे. 
निळवंडे धरणाचे कालवे व प्रवरा नदीपात्रातील भूमिगत बंधाºयावरून एकमेकांना शह काटशह देण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यात आपसूकच माजी मंत्री मधुकरराव पिचड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मंत्री राधाकृष्ण विखे हे प्रचारात ओढले जात आहेत.  
प्रचारातील प्रमुख मुद्दे
आपण स्थानिक उमेदवार आहोत. लोकांसाठी सहजासहजी उपलब्ध होतो. राजकीय जीवनात साधेपणाने वावरतो. विखे व मुरकुटे यांच्या मदतीने तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवून देऊ. गत पाच वर्षे विरोधी पक्षात राहिलो. आता मात्र विकासाला चालना देऊ, असा प्रचार कांबळेंच्या वतीने केला जात आहे.
काँग्रेसकडूनही कांबळे व सेना-भाजपचा समाचार घेतला जातो आहे. शेतमालाला हमी भाव नाही. कांद्याची निर्यात रोखली. दुष्काळी यादीतून तालुका वगळला गेला. पीक विम्याचा कुठलाही लाभ झाला नाही. कांबळे यांचा  प्रशासनावर वचक नाही, अशी टीका सुरू आहे.

Web Title: Elections on the question of agriculture, water in Shrirampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.