आरक्षण हा राज्यातील मराठा समाजाच्या विकासाचा व समाजातील तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा असतानाही महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर लढाईत कुचराई केल्याचा आरोप पाचपुते यांनी केला. फडणवीस सरकारने या मुद्द्यावर घटनात्मक कार्यवाही करून दिलेल्या आरक्षणाचादेखील आघाडी सरकारने मुडदा पाडला. त्यामुळे यापुढे आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या नावाने व नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजपा पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात होणाऱ्या आंदोलनांमध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा भाजपचा निर्धार आहे, असेही पाचपुते यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, हे सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचल्यावर उघड होते. ठाकरे सरकारने ही फसवणूक थांबवावी व समाजास न्याय मिळावा यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे. त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक राज्यव्यापी आंदोलनात भाजपचा सक्रिय सहभाग राहील, असे ते म्हणाले.