गव्हाची पेरणी, ऊस लागवड रखडली
By Admin | Updated: December 18, 2015 23:15 IST2015-12-18T23:08:00+5:302015-12-18T23:15:16+5:30
अहमदनगर : पाटपाण्याच्या अभावामुळे जिल्ह्यात गव्हाची पेरणी आणि उसाच्या लागवडीचे प्रमाण चिंताजनक बनले आहे.

गव्हाची पेरणी, ऊस लागवड रखडली
अहमदनगर : पाटपाण्याच्या अभावामुळे जिल्ह्यात गव्हाची पेरणी आणि उसाच्या लागवडीचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. चारा पिकाची स्थिती बरी असून कांदा पिकाचे क्षेत्र गत आठवड्याच्या तुलनेत दहा हजार हेक्टरने वाढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अवघ्या ९ टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली असून जवळपास उसाच्या लागवडी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
खरिपापाठोपाठ जिल्ह्यात रब्बी हंगामातील शेतीचे चित्र विदारक बनले आहे. ज्वारी, चारा पिके आणि कांदा वगळता अन्य सर्वच पिकांची पेरणी स्थिती चिंताजनक आहे. हरभरा पिकाचे क्षेत्र ६० टक्के असले तरी पिकाला आवश्यक असणारे पाणी आणि पिकावरील किडीमुळे हे पीक शेतकऱ्यांच्या किती टक्के पदरी पडणार हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.
सध्या संमिश्र हवामान आहे. कधी ढग येतात आणि जातात. तर कधी थंडी असते. यामुळे शेतात उभ्या असणाऱ्या पिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
दक्षिण जिल्ह्यात ज्वारी पीक जोमात आहे. हे पीक सध्या हुरडा अवस्थेत असून काही ठिकाणी पाण्याअभावी ज्वारी करपण्यास सुरूवात झाली आहे. ६४ टक्के हेक्टरवर रब्बी मका पिकाची पेरणी झालेली असून काही ठिकाणी पेरणीचे काम वेगात आहे.
करडई पिकाची १७ टक्के क्षेत्रावर, तीळ पिकाची १२ टक्के क्षेत्रावर, जवस पिकाचे ६ टक्के क्षेत्रावर आणि सुर्यफूल पिकाची ६ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.
कांदा पिकाचे क्षेत्र ८२ हजार ८४२ हेक्टरपर्यंत पोहचले असून यात आणखीन वाढ होणार आहे. ऊस पिकाचे क्षेत्र गत आठवड्यात जेवढे होते, तेवढेच आहे. २५ हजार ५८२ हेक्टरच्या पुढे ऊस क्षेत्र सरकरलेले नाही. यामुळे पुढील वर्षीच्या गळीत हंगामाचा विषय चिंतेचा राहणार आहे. यंदा चारा पिकाचे क्षेत्र ५५ हजार हेक्टर असल्याने जनावरांच्या चाऱ्याच्या दृष्टीने हे आशादायक चित्र राहणार आहे.
(प्रतिनिधी)