पेरायचं काय अन् खायचं काय?
By Admin | Updated: August 2, 2014 00:40 IST2014-08-01T23:23:12+5:302014-08-02T00:40:35+5:30
अकोले: ‘पराडाची माती वरुन घसरुन येताय, मंग तुंबारा बसून चर फुटला, समदं वावर वाहून गेलं. पाच-सहा पायलीचा राब होता, समदा पाण्यात गेला.
पेरायचं काय अन् खायचं काय?
अकोले: ‘पराडाची माती वरुन घसरुन येताय, मंग तुंबारा बसून चर फुटला, समदं वावर वाहून गेलं. पाच-सहा पायलीचा राब होता, समदा पाण्यात गेला. आवणीची वावरं मातीमैलान भरुन गेल्यात, आता पेरायचं काय अन् खायाच काय?’, अशी कैफीयत एकदरा येथील आदिवासी शेतकरी तुकाराम धोंडू भांगरे, पार्वताबाई भांगरे, चांगुनाबाई भांगरे मांडली. या नुकसानीची दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न त्यांना सतावतोय़
बित्तमगड परिसरात महाकाय डोंगराच्या पायथ्याला वनक्षेत्रात चर खोदून पाणी आढळा खोऱ्यात आणण्याचा प्रकल्प सुरु आहे. आदिवासी विभागाच्या सहकार्याने वनविभागाने वनक्षेत्र ग्रामपंचायतीला हस्तांतरित केले असून, वनसमितीच्यावतीने काम सुरु आहे. चार सिमेंट बांध घालण्यात आले असून वन जमिनीत वृक्ष तोड झाली आहे. मात्र काही ठिकाणी मातीच्या चरावर नुकतेच बांबूची रोपे लावण्यात आली आहेत. केतकी, खराळाचा व वांजरघोटी ओहळ असे तीन ओढ्याचे पाणी एकत्र केले असून दीड किलोमीटरच्या चर कालव्यातून पाणी काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम अपुरे झाले असून तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने चर काही ठिकाणी फुटला तर काही शेतांचे नुकसान झाल्याने पाणी वळवण्यात आले आहे.
या पाण्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे नुकसान झाले असून काही रोपे वाहून गेली. काही शेतात गुडघ्या इतकी माती साचल्याने शेती दिसेनाशी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटले आहे. शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी गांगरुन गेला आहे. वन जमिनीत चर खोदल्याने भविष्यात ‘माळीण’ गावासारखे येथेही जमिनीचे भूस्खलन होण्याची भीती गावकरी व्यक्त करत आहेत. काळू धोंडू भांगरे, नाथु सखाराम भांगरे, वाळीबा भांगरे आदींच्या जमिनीचे व भात रोपांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भाजपाचे जालिंदर वाकचौरे व सेनेचे डॉ. शरद तळपाडे यांनी केली आहे.
बिताका गावाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून, चिखलात गावकरी वाट धुंडाळताना दिसतात. रस्ता नावालाच शिल्लक राहिला आहे. चरामुळे झाडी नष्ट झाली असून येथे वृक्ष लागवड व संवर्धन होणे गरजेचे आहे. दीड किलोमीटर लांब व ६५० ते ७०० फूट उंच अशा चौरसक्षेत्रावर पडणाऱ्या पावसाचे पाणी चरातून धरणक्षेत्राकडे वळवण्याचा प्रयत्न आहे़ अधिक पावसामुळे शेतीची हानी होईल असे पाचघरवाडी, एकदरा, जायनावाडी, बिताका येथील गावकरी सांगतात.
पर्यावरण पूरक काम नाही. मोठी रक्कम खर्च होऊन झुळझुळ पाणी वाहत आहे. आढळा लाभक्षेत्राला चराचा अपेक्षित फायदा दिसत नाही.
-जालिंदर वाकचौरे, शेतकरी
एकदरा, जायनावाडी भागात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़
-रुपेश सुराणा, नायब तहसीलदार
वनहद्दीत काम झाले असले तरी वनविभागाचा संबंध येत नाही. जमीन गावाकडे वर्ग केली असून वनसमिती व गावकरी यांच्यामार्फत काम सुरु आहे़
-शिवाजी फटांगरे, उपविभागीय वन अधिकारी