‘मुळा’त पाणीसाठा जुलैपर्यंतच
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-13T23:26:40+5:302014-06-14T01:19:29+5:30
अहमदनगर: मुळा धरणात जुलै अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे़ नगर शहरासह जिल्ह्यातील विविध पाणी योजनांना मुळातून पाणी पुरवठा होत
‘मुळा’त पाणीसाठा जुलैपर्यंतच
अहमदनगर: मुळा धरणात जुलै अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे़ नगर शहरासह जिल्ह्यातील विविध पाणी योजनांना मुळातून पाणी पुरवठा होत असून, मान्सूनने पाठ फिरविल्यास मृतसाठ्यातून पाणी उपसा करावा लागेल़ परिणामी पाणीपुरवठ्यात कपात होण्याची शक्यता आहे़
नगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या मुळाधरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून मध्यंतरी वाद निर्माण झाला होता़ मराठवाडा परिषदेने जायकवाडीत पाणी सोडण्याची मागणी जोरकसपणे केली होती़ मात्र नगर जिल्ह्यातील पाणी जायकवाडीला देण्यास कडाडून विरोध झाला़ त्यामुळे गतवर्षी मुळातील पाण्यावरून राजकारण चांगलेच पेटले होते़ यंदा मात्र मुळातून एक थेंबही जायकवाडीला सोडण्यात आला नाही़ त्यामुळे दोन्ही हंगामात शेतीसाठी पाणी आवर्तनं सोडण्यात आले़ उन्हाळी हंगामासाठी आवर्तन नुकतेच बंद करण्यात आले़ लोकसभा निवडणुकीमुळे उन्हाळी आवर्तनास विलंब झाला़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पाण्यावरून वाद झाले़ उन्हाळ्यात सहा हजार ३०० दशलक्ष घनफूटपाणी शेतीसाठी वापरण्यात आले आहे़ उन्हाळी हंगामासाठी आर्वतन दिल्याने आता मुळा धरणात ८२६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे़ हा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव असून, साधारणपणे आॅगस्टपर्यंत मुळा धरणात मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक सुरू होते, असा पाटबंधारे खात्याचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे़ परंतु तसे न झाल्यास पाण्यासाठी पुन्हा रस्सीखेच होण्याची शक्यता आहे़
शहरासह जिल्ह्याला मुळातून पिण्यासाठी पाणी योजनांव्दारे पाणी दिले जात आहे़ पाणी योजनांव्दारे पिण्यासाठी दररोज १२ दशलक्ष घनफूट पाण्याचा उपसा होतो़ उन्हाचा पारा वाढल्याने बाष्पीभवनही मोठ्याप्रमाणात होते़ पण मान्सून जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात दाखल होतो़ त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होत नाही़ मात्र मान्सून अडकला असून, यंदा पाऊस कमी असणार आहे, असे अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात येत आहेत़ त्यामुळे जुलैनंतर पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याने सध्या चिंता नसली तरी पाऊस पडलाच नाही तर पाणीकपात करण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे़
दररोज १२ दशलक्ष घनफूट उपसा
मुळा धरणातून पिण्यासाठी पाण्याचा उपसा केला जात आहे़ पिण्यासाठी विविध पाणी योजनांव्दारे १२ दशलक्ष घनफूट पाण्याचा उपसा केला जात असून, याप्रमाणे पाणी उपसा झाल्यास पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल़