वारी नाही.. जीवनातील चैतन्याचा ठेवाच संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:34+5:302021-07-22T04:14:34+5:30
श्रीगोंदा : पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत।। व्रत एकादशी करीन उपवासी। गाईन अहर्निशी मुखी नाम।। ...

वारी नाही.. जीवनातील चैतन्याचा ठेवाच संपला
श्रीगोंदा :
पंढरीची वारी आहे माझे घरी।
आणिक न करी तीर्थव्रत।।
व्रत एकादशी करीन उपवासी। गाईन अहर्निशी मुखी नाम।।
नाम विठोबाचे घेईन मी वाचे।
बीज कण्यांतीचे तुका म्हणे।।
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे पंढरीऱ्या पायी वारीचा आनंद असंख्य वारकरी घेत असतात. यातून भक्ती-शक्ती उत्सवाचा जागर होतो. तसेच श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथील वारकरी महादेव गणपत शेंडगे हे ३८ ते ४० वर्षे श्रीगोंदा ते पंंढरपूर आषाढी वारीचा आनंद लुटत आहेत. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांपासून पायी वारी बंद झाली. त्यामुळे जीवनातील चैतन्याचा ठेवाच संपला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महादेव गणपत शेंडगे यांची परिस्थिती बेताचीच होती. मात्र, घरात पांडुरंगाच्या नामाचा जागर कायम होत असे. अशा परिस्थितीत महादेव शेंडगे यांनी २८ व्या वर्षापासून श्रीगोंद्याचे तात्या महाराज महापुरुष पायी दिंडी सोहळ्यातून पायी वारी करण्यास सुरुवात केली. काही वर्षे ढोरजेचे गोवर्धन महाराज गाडे यांच्या दिंडी सोहळ्यात भाग घेतला. पंढरीच्या भेटीची आस दर वारीत पूर्ण होत होती. अध्यात्मिक विचारातून मुलांवर संस्कार झाले. सारे घर शाकाहारी झाले. अध्यात्मिक व शैक्षणिक विचारातून कुटुंबाला प्रगतीची दिशा मिळाली, असे शेंडगे यांनी सांगितले. पंढरीच्या वारीतून चांगल्या विचाराची माणसे जोडली गेली. गावोगावची माणसे, प्रथा, रिती समजले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून वारी बंद आहे. त्यामुळे आमचे आयुष्य दहा वर्षांनी कमी झाल्यासारखे वाटते. कधी कोरोना जाईल पुन्हा वारीचा जागर होईल. पायी वारी करून विठुरायाचे दर्शन होईल याची प्रतीक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.