सोनई-करजगावसह 18 गावाचे ग्रामस्थ बसले नगरला उपोषणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 17:17 IST2019-07-23T17:17:33+5:302019-07-23T17:17:55+5:30
सोनई - करजगाव सह 18 गावांची पाणी योजना तातडीने सुरू करावी. ती योजना सुरु होण्यापर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चालू करावी, कामे पूर्ण झाली नसतांना ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चौकशी करावी.

सोनई-करजगावसह 18 गावाचे ग्रामस्थ बसले नगरला उपोषणाला
अहमदनगर : सोनई - करजगाव सह 18 गावांची पाणी योजना तातडीने सुरू करावी. ती योजना सुरु होण्यापर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चालू करावी, कामे पूर्ण झाली नसतांना ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चौकशी करावी. योजनेचे काम पूर्ण करून 1 वर्ष योजना प्राधिकरणाने चालवावी या मागणीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ नगर येथील जीवन प्राधिकरणाच्या आॅफिस समोर उपोषणाला बसले आहेत.
या सर्व प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ जुलै 2019 पासून बंद केलेली पाणी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी गडाख यांच्या समवेत अठरा गावचे सरपंच व ग्रामस्थांनी सोनई येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यात जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांनी याबाबत लेखी दिले होते परंतु यावर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हे सर्व ग्रामस्थ नगर येथे उपोषणाला बसलेले आहेत. या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.
प्राधिकरणाच्या आॅफिसमध्ये उपोषणकर्ते आले त्यांनी तेथे ठिय्या मांडला व टाळ, मृदंगसह जप चालू केला. अधिकारी, ठेकेदार व नेवाशाचे आमदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पंचायत समितीच्या सभापती कल्पना पंडित, दगडुभाई इनामदार, सुभाष जाधव, बाळासाहेब वायभासे, केशव औटी, रमेश पुंड, गोरख माकोने, चंद्रकांत टेमक, अण्णासाहेब मकोने, 18 गावातील सरपंच, उपसरपंच, क्रांतिकारी पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .
राहुरी तालुक्यातील 3 गावांना दिलेले अनधिकृतपणे कनेक्शन दिल्यामुळे नेवासा तालुक्यातील 18 गावांची पाणी योजना अडचणीत आली आहे. तसेच पूर्ण दाबाने पाणी येत नाही व टाक्या भरत नाही राहुरीचे गावे जोडण्यासाठी नेवशाच्या लोकप्रतिनिधींनी लेखी समंती दिली आहे. या योजनेचे छोटे मोठे कामे अपूर्ण असतांनाही ठेकेदाराला पेमेंट दिले गेले आहे यात मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चवकशी करण्याची मागणी आहे. कामे अपूर्ण असतांना योजना हस्ततारण करण्याचा घाट घातला जात असल्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.