बेमोसमी पावसाचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:16 IST2021-01-09T04:16:43+5:302021-01-09T04:16:43+5:30
शेतात पाणी साचल्याने कांदा पीक उत्पादनाबद्दल शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. काढणीला आलेली मका भुईसपाट झाली. फळबागानांही बेमोसमी ...

बेमोसमी पावसाचा पिकांना फटका
शेतात पाणी साचल्याने कांदा पीक उत्पादनाबद्दल शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. काढणीला आलेली मका भुईसपाट झाली. फळबागानांही बेमोसमी पावसाचा फटका बसला. संगमनेर तालुक्यातील बहुतांश भागात गुरुवारी रात्रभर जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाऊस शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरू होता. अकलापूर, आंबी खालसा, बोरबन आदी गावांमध्येही रात्रभर पाऊस सुरू होता. ज्या शेतकऱ्यांनी डाळिंबाचा बहार धरला होता. त्या बागांची फुलगळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. दरम्यान, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठा खर्च करून कांदा, मका, वाटाणे, गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके घेतली आहेत. मात्र, गुरुवारी झालेल्या पावसाने या पिकांना फटका बसला आहे.
_
०८ घारगाव
फोटो ओळ : बेमोसमी पावसाने शेतातील कांद्याच्या पिकात पाणी साचले आहे.