निकालाच्या सूत्राने उडाली बारावी विद्यार्थ्यांची झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:43+5:302021-07-22T04:14:43+5:30
-------------- अहमदनगर : बारावीच्या निकालात ३०:३०:४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ४० टक्के असे ...

निकालाच्या सूत्राने उडाली बारावी विद्यार्थ्यांची झोप
--------------
अहमदनगर : बारावीच्या निकालात ३०:३०:४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ४० टक्के असे निकालाचे सूत्र ठरले आहे. तिन्हीचे मिळून विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळणार आहेत. परंतु हुशार विद्यार्थ्यांना याचाच फटका बसण्याची चिंता आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन निकषांची शिफारस करण्यासाठी ३०:३०:४० फॉर्म्युला ठरला आहे. म्हणजे दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालातून प्रत्येकी ३० असे ६० टक्के मूल्यांकन होणार आहे, तर बारावीच्या पूर्व परीक्षेतून ४० टक्के गुण घेतले जाणार आहेत. मुळात विद्यार्थी बारावी हे महत्त्वाचे वर्ष गृहीत धरून अभ्यास करतात. करिअरच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे असल्याने या वर्षात विद्यार्थी जास्त मेहनत हेऊन, खासगी शिकवण्या लावून गुणवत्ता वाढवण्यास प्रयत्नशील असतात. यातून अनेकदा विद्यार्थ्याचे दहावी व अकरावीच्या तुलनेत बारावीत गुण वाढल्याचेही दिसले आहे. परंतु यंदा कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा न झाल्याने बारावीच्या निकालात दहावी व अकरावीचे गुणही विचारात घेतले जाणार आहेत. अनेक मुलांना दहावी व अकरावीत कमी गुण असतात. परंतु हेच गुण विचारात घेतले जाणार असल्याने बारावीची गुणवत्ता ढासळण्याची चिंता मुलांना लागली आहे. अनेक जण अकरावी रेस्ट ईअर समजतात. त्यामुळे हुशार विद्यार्थीही अकरावीत केवळ उत्तीर्ण होण्याइतपत अभ्यास करतात. परंतु तेच रेस्ट ईअर यंदा बारावीच्या गुणांवर परिणाम करणार आहे. यामुळे अनेक पालक व विद्यार्थीही चिंतीत आहेत.
--------------
असे असेल बारावी निकालाचे सूत्र
दहावीच्या पाच विषयांपैकी तीन विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण, अकरावीच्या पाच विषयांचे सरासरी गुण आणि बारावी पूर्व परीक्षा आणि प्रॅक्टिकलचे गुण बारावी निकालात विचारात घेतले जाणार आहेत. दहावीचे ३० टक्के गुण, अकरावीच्या गुणातील ३० टक्के आणि १२ वी च्या ४० गुणांवर आधारित निकाल लावण्यात येतील.
----------------
जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी-
सीबीएसई - ६४००
मुले - ४२१५
मुली - २२७६
स्टेट बोर्ड - ६४१२४
मुले - ३७०५२
मुली - २७०९२
---------
३० टक्के सूत्र गणित बिघडविणार
प्रत्यक्ष परीक्षा झाल्या असत्या तर बारावीच्या मुलांना गुणवत्ता सिद्ध करता आली असती. परंतु आता परीक्षा न होता ३० टक्के सूत्राने अनेकांचे गणित बिघडणार आहे.
- सुकृत कुलकर्णी, विद्यार्थी (फोटो)
------------
कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे अनेक मुलांचा अभ्यास झाला नाही. परंतु जे हुशार मुले आहेत त्यांच्या बारावीच्या गुणांना ३०-३०-४० सूत्रानुसार फटका बसेल. त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
- सोहम चिकटे, विद्यार्थी (फोटो)
--------------
विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा
कोरोनामुळे परीक्षा होणार नसल्याने बारावीच्या निकालासाठी दहावी व अकरावीच्या निकालाचा आधार घ्यावा लागला. यातून ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतेय असे वाटते, त्यांना श्रेणी सुधारनुसार परीक्षा देता येईल किंवा बारावीनंतर प्रवेश परीक्षा देऊनच पुढील दिशा निवडता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस करावा.
- प्रा. सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना
(फोटो - २१सुनील पंडित)
----------------
ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालाबाबत शंका असेल त्यांना स्वतंत्र परीक्षा देता येणार आहे. शिवाय विद्यार्थी पुढील करिअरच्या दिशा निवडताना त्या त्या प्रवेशाची सामाईक परीक्षा असतेच. तिथे त्याला आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल.
- प्रा. जितेंद्र आरू
(फोटो - २१जितेंद्र आरू)
--------------