सुदाम देशमुख
शेवगाव (जि. अहिल्यानगर) : येथील महाविद्यालयीन तरुण आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते. कारने परत गावी येत असताना त्यांच्या कारला मंगळवारी अपघात झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या घटनेत एक युवक गंभीर जखमी आहे.
संबंधितांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील उरवकोंडा परिसरात कार पलटी होऊन सदर अपघात झाला आहे. या अपघातात सौरभ विष्णू अकोलकर (रा. हातगाव, ता. शेवगाव), तुषार सुनील विखे (रा. मिरी रोड, सोनविहार, ता. शेवगाव), श्रीकांत थोरात (विद्यानगर, शेवगाव ) हे तिघे मयत झाले आहेत. सुमित अकोलकर हा युवक गंभीर जखमी झाला आहे. परराज्यात सदरचा अपघात घडल्याने अधिकची माहिती समजू शकली नाही. अपघात घडला त्या भागातील स्थानिक भाषेतील एका वृत्तवाहिनीने या अपघाताचे वृत्त दिले. त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे वृत्त समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच संबंधितांचे नातेवाईक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले आहेत.