थोरात, विखेंशी चर्चेनंतर उमेदवारीचा निर्णय
By Admin | Updated: July 14, 2014 00:58 IST2014-07-14T00:31:40+5:302014-07-14T00:58:26+5:30
श्रीगोंदा : आ. बबनराव पाचपुतेंच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा करावा ही काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे.

थोरात, विखेंशी चर्चेनंतर उमेदवारीचा निर्णय
श्रीगोंदा : आ. बबनराव पाचपुतेंच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा करावा ही काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून उमेदवारीचा फैसला करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीगोंदा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शिरूर, दौंड, आंबेगाव तालुक्यात श्रीगोंद्यापेक्षा जादा सबस्टेशन आहेत. श्रीगोंद्यात सबस्टेशन झाली मग शेतकऱ्यांना वीज का मिळत नाही. कुकडीवाल्यांना पाण्याचा हिशोब दिला जात नाही. घोड धरणाच्यावर बंधारे झाल्याने घोडवाल्याचा गळा घोटला आहे, याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत विखे, थोरात यांनी श्रीगोंद्यात आघाडीचा धर्म पाळण्याचा आदेश दिला तर काय करणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच आम्ही आयुष्यभर आघाडीचा धर्म पाळायचा का? ही निवडणूक कुणा एका व्यक्तीच्या विरोधात नसून विकास, समाजकारणातील प्रश्न सोडविण्यासाठी एका विचाराने लढवावी लागणार आहे, असे नागवडेंनी शेवटी सूचित केले.
जगतापांना चिमटा
तिकीट मिळो अथवा ना मिळो मी उभा राहणार असे काहींनी जाहीर केले आहे, परंतु आम्ही तसे करणार नाही. आमची सर्वांना बरोबर घेण्याची तयारी आहे, असा चिमटा नागवडेंनी जगतापांना काढला.
कोणी शब्द दिला!
यावेळी तुम्ही मदत करा पुढील वेळी आम्ही तुम्हाला मदत करू, असा शब्द कुणाला दिला नव्हता. शब्द दिला असता तर सभेत सांगितले असते. ते बरोबर आले तर उद्या त्यांनाही बरोबर घेऊ.
-राजेंद्र नागवडे, माजी अध्यक्ष, श्रीगोंदा साखर कारखाना.
घर कसे चालणार
एकास एक उमेदवार देण्यासाठी राहुल जगताप यांची समजूत घालू आणि वेळप्रसंगी घनश्याम शेलार यांच्याशी बोलावे लागणार आहे. सर्वजण कारभारी झाले तर घर कसे चालणार. भल्यासाठी चार पावले मागे घेण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.
-बाळासाहेब नाहाटा, सभापती, बाजार समिती, श्रीगोंदा
राष्ट्रवादीचे षडयंत्र
आमची एकास एक उमेदवार देण्याची तयारी आहे, परंतु राष्ट्रवादीवाले जादा उमेदवार उभे करण्यासाठी षडयंत्र रचित आहेत.
-आण्णासाहेब शेलार, माजी उपाध्यक्ष, जि.प.
...तर सत्ता परिवर्तन
श्रीगोंद्यात एकास एक उमेदवार आणि २००४ प्रमाणे श्रीगोंदा विधानसभा विकास आघाडी स्थापन केली तर सत्ता परिवर्तन निश्चित होईल.
-प्रा.तुकाराम दरेकर, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस.