तेरा लघु पाटबंधारे ओव्हरफ्लो

By Admin | Updated: July 11, 2016 23:59 IST2016-07-11T23:45:13+5:302016-07-11T23:59:14+5:30

अकोले/बोटा/ब्राम्हणवाडा,गणोरे : भंडारदरा धरण पाणलोटासह हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसूबाई परिसरात रौद्रावतारी पावसामुळे तालुक्यातील सर्व १३ लघुपाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.

Thirteen short-circuit overflows | तेरा लघु पाटबंधारे ओव्हरफ्लो

तेरा लघु पाटबंधारे ओव्हरफ्लो

अकोले/बोटा/ब्राम्हणवाडा,गणोरे : भंडारदरा धरण पाणलोटासह हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसूबाई परिसरात रौद्रावतारी पावसामुळे तालुक्यातील सर्व १३ लघुपाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.
कालच्या पावसामुळे मुळा नदीला मोठा पूर आला. कोतूळ येथील कोतूळेश्वर मंदिरास पुराचा वेढा पडला आहे. प्रवरा नदी दुथडी भरून वाहती झाली आहे. टिटवी, पाडोशी, सांगवी,बलठण आदींसह सर्व लघुपाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.
तालुक्यातील कच नदीवरील बेलापूर बदगी येथील ९३ दलघफू क्षमतेचा लघुपाटबंधारे पाझर तलाव जोरदार पावसाने सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भरून वाहू लागला. यामुळे खालील बोटा परिसरातील कोटमारा धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी कमी पर्जन्यमानामुळे हा लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने न भरल्याने या परिसरालाही दुष्काळाचे चटके सहन करावे लागले होते. दोन दिवसांपासून बेलापूर बदगी लगतच्या ब्राह्मणवाडा पाणलोट क्षेत्रात बरसत असलेल्या जोरदार पावसाने तेथून उगम पावणारी कच नदी भरून वाहू लागल्याने हे पाणी बेलापूर बदगीच्या या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीयेण्यास रविवारी सकाळपासून सुरवात झाली व पाहता पाहता सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान हा तलाव पूर्णपणे भरला. या तलावाचे पाणी आता थेट शेजारील संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरातील कोटमारा धरणात येणार असल्याने मागील वर्षी पाण्याची आवक न झाल्याने तळ गाठलेले हे धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
भंडारदरात ५ तर मुळात १० टीएमसी पाण्याची आवक
राजूर/राहुरी: अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्टयात आज पावसाचा जोर ओसरला.त्यामुळे भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणीसाठ्यात नवीन पाण्याची आवकही कमी झाली असून भंडारदरा धरणात दिवसभराच्या १२ तासांत केवळ ३४५ द.ल.घ.फू. नवीन पाणी येत भंडारदरा धरण सायंकाळी ६ वाजता ४५टक्के भरले.सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत रतनवाडी येथे सर्वाधिक म्हणजेच साडेअकरा इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली तर त्या खालोखाल पांजरे येथे साडेनऊ इंचाहून अधिक पाऊस कोसळला.सायंकाळी सहा वाजता मुळा धरणातील पाणीसाठ्याने १० टी.एम.सी चा टप्पा ओलांडला.
शनिवारी दुपारपासून ते रविवारी संध्याकाळपर्यंत दोन्ही धरणांच्या पाणलोटास पावसाने अक्षरश: झोडपून काढले.या मोसमात घाटघर,रतनवाडीव हरिचंद्र गड परिसरात सर्वाधिक पाऊस या दीड दिवसांत कोसळला. सोमवारी सकाळपासूनच तालुक्याच्या पश्चिम पट्टयातला पावसाचा जोर कमी कमी होत गेला. काल दिवसभर धो धो पाऊस बरसणाऱ्या भंडारदरा येथे सोमवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या बारा तासांत केवळ १७ मी.मी. पाऊस पडला तर अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या घाटघर येथेही सकाळी ६ पर्यंत केवळ १६१ मी.मी. पावसाची नोंद झाली. मात्र रतनवाडी येथे २९२ मी.मी. तर त्या खालोखाल पांजरे येथे २४० मी.मी. पावसाची नोंद झाली तर वाकी येथे १८९ मी.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली.मात्र यानंतर दिवसभरात पावसाचा जोर ओसरला. एकंदरीत भंडारदरा धरणाच्या पाणलोटात आज दिवसभराच्या १२ तासात कमी पाऊस झाल्यामुळे भंडारदरा धरणातील नवीन पाण्याची आवकही कमी झाली आणि या धरणात सायंकाळी ६ वाजता ४ हजार ९८३ द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा झाला.
निळवंडे धरणाच्या पाणलोटातही पावसाचा जोर मंदावल्यामुळे या धरणातील नवीन पाण्याची आवक कमी झाली असून सायंकाळी ६ वाजता या धरणातील पाणीसाठा १ हजार ७८१ द.ल.घ.फू. झाला होता.वाकी येथील लघुपाटबंधारे वरुन पडणाऱ्या पाण्याचा विसर्गही कमी होत तो २ हजार १९९ क्युसेकवर आला.मुळा धरणाच्या पाणलोटातही आज दिवसभर पावसाचे प्रमाण कमी झाले, त्यामुळे मुळानदीचा विसर्गही कमी झाला. सोमवारी सकाळी ६ वाजता लहीत येथील मुळा नदीचा विसर्ग ३३ हजार १७७ क्युसेक होता तर सायंकाळी सहा वाजता तो १५ हजार ७७६ क्युसेक वर आला मुळा धरणात आज दिवसभरातील १२ तासांत ९४४ द.ल.घ.फू. नवीन पाणी येत सायंकाळी सहा वाजता या धरणातील पाणीसाठा १० हजार १८ द.ल.घ.फू. इतका झाला.राजूर परिसरातही आज दिवसभर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत होत्या.
कुकडी प्रकल्पात ७ टीएमसी पाणी
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात धुवाँधार पाऊस झाला़ त्यामुळे अवघ्या दोन दिवसात कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा ७ टीएमसीवर (२१ टक्के) पोहोचला आहे़ येडगाव धरणातून २७ हजार क्युसेकने घोड नदीत पाणी सोडण्यात आले आहे़ हे पाणी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत घोड धरणात धडकणार आहे़
गेल्या वर्षी ११ जुलैअखेर कुकडी प्रकल्पात पावणे तीन टीएमसी (९ %) उपयुक्त पाणीसाठा झाला होता़ या वर्षी हा पाणीसाठा १४ टक्क्यांनी वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले़ कुकडी नदीवरील येडगाव धरणात १ हजार ९२१ एमसीएफ्टी ( ६८%) उपयुक्त पाणीसाठा झाला असून, येडगाव धरणातून २७ हजार ७६ क्युसेसने घोड नदीत पाणी सोडण्यात आले आहे़ त्यामुळे घोड नदीला पूर आला आहे़ घोड नदी परिसरातील गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़
पिंपळगाव जोगे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे़ त्यामुळे मृतसाठ्यात ४ हजार ८ एमसीएफटी पाणी आले असल्याची माहिती नारायणगावचे कार्यकारी अभियंता नान्नुरकर यांनी दिली़ (प्रतिनिधी)
‘गोदावरी’च्या पाण्याने कोपरगावकर आनंदी
कोपरगाव : नाशिक जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरू असल्याने दारणात प्रचंड आवक झाली. त्यामुळे धरणातून सोडलेले पाणी आज सकाळी अकरा वाजता गोदावरी नदीत पोहचताच कोपरगावकरांनी जल पूजन करून जल्लोषात आनंद साजरा केला. सतत चार वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याने यंदा उन्हाळ्यात कोपरगावाला भीषण दुष्काळाच्या झळा बसल्या. यावर्षीही पावसाची शाश्वती नसल्याने गोदावरी नदीचे पात्र मागच्या पावसाळ्यापासून कोरडेठाक होते. त्यामुळे शहरासह तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. पिण्याच्या पाण्यावाचून कोपरगावकरांचे अतोनात हाल होत आहेत. जून महिना कोरडा गेल्याने सर्वांना पावसाची चिंता लागली होती. अखेर गेल्या दोन-तीन दिवसांपासून दारणा धरणाच्या लाभक्षेत्रात मुसळधार वृष्टी झाल्याने पाण्याची मोठी आवक झाली. पावसाचे सातत्य टिकून असल्याने धरणातून काल सायंकाळी गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आले. हे पाणी आज सकाळी शहरात पोहचताच नागरिकांनी गोदाकाठी मोठी गर्दी केली होती. नदीला आलेले पाणी पाहून सर्वांना हायसे वाटले. नदी दुथडी भरून वाहू लागल्याने अनेकांनी जल्लोषात आनंद साजरा केला. सुशांत खैरे, मोहीत गंगवाल, प्रसिद्धीप्रमख अमित लोहाडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

Web Title: Thirteen short-circuit overflows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.