शिक्षक जाईनात वर्गावर; शिक्षणाधिकाऱ्यांनी काढली खरडपट्टी
By Admin | Updated: July 2, 2017 17:08 IST2017-07-02T17:08:36+5:302017-07-02T17:08:36+5:30
पंधरा दिवस शिक्षकांनी काय केले, मुलांना कोणी शिकवले असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

शिक्षक जाईनात वर्गावर; शिक्षणाधिकाऱ्यांनी काढली खरडपट्टी
अहमदनगर : शाळा उघडून पंधरा दिवस झाले तरीही वर्ग वाटप न झाल्यामुळे शिक्षक वर्गावर जाण्यास तयार नाहीत़ त्यामुळे पंधरा दिवस शिक्षकांनी काय केले, मुलांना कोणी शिकवले असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. शिक्षकांच्या गोंधळातच मागील आठवड्यात पहिल्याच्या वर्गात मुलगी अडकली होती. याप्रकरणी शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी शाळेला भेट देत शिक्षकांची खरडपट्टी काढली.
निंबळक (ता.नगर) येथे सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे. येथील शाळेत नुकतेच दोन दिवसापूर्वी पहिलीची मुलगी शाळा सुटल्यानंतर तब्बल पाऊणतास वर्गात अडकली होती. खेळण्यासाठी आलेल्या मुलांनी तिची सुटका केली़ ही बातमी ‘लोकमत’ला प्रसिद्ध होताच शिक्षणाधिकारी यांनी शाळेची पाहणी केली़ तसेच सर्व शिक्षकांची खरडपट्टी काढली. शाळा उघडून पंधरा दिवस झाले तरी वर्ग वाटप केले नाही, पंधरा दिवस शिक्षकांनी काय केले, असे प्रश्न शिक्षणाधिकाऱ्यांनी उपस्थित केले़ एकीकडे जिल्हा परिषदेचा दर्जा वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
वर्ग वाटप नाही, त्यामुळे वर्गावर कोण शिकवणार, मुख्याध्यापिकेने वर्ग वाटप का केले नाही, केंद्रप्रमुखांच्या ही बाब का लक्षात आली नाही, त्यांनी शाळेला भेट का दिली नाही, असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत़