साईनगरीत संक्रांतीचा गोडवा हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST2021-01-14T04:17:47+5:302021-01-14T04:17:47+5:30
कोविडमुळे गेल्या वर्षातील तब्बल आठ महिने साईनगरीच्या अर्थकारणाचा गाडा रुतलेला होता. येथे जवळपास साडेसातशे लहान-मोठी हॉटेल्स आहेत. गेल्या काही ...

साईनगरीत संक्रांतीचा गोडवा हरपला
कोविडमुळे गेल्या वर्षातील तब्बल आठ महिने साईनगरीच्या अर्थकारणाचा गाडा रुतलेला होता. येथे जवळपास साडेसातशे लहान-मोठी हॉटेल्स आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिर्डीतील हॉटेल व अन्य उद्योग व्यवसायांना घरघर लागली आहे. त्यात कोविडमध्ये मंदिर बंदमुळे साईनगरीचे कंबरडेच मोडले. भाडोत्री हॉटेल किंवा दुकाने घेऊन पोट भरणारे भाडे न भरू शकल्याने कुटुंब कबिल्यासह आपापल्या गावी परतले आहेत. गेल्या महिन्यात साई मंदिर उघडले. मात्र, दहा वर्षांखालील व ६५वर्षांवरील व्यक्तींना दर्शन बंदी असल्याने गर्दीला आपोआपच ब्रेक लागला. कोविडमुळे रोज पंधरा ते वीस हजार भाविक दर्शन घेत आहेत. त्यातील बहुतांश जण दर्शन घेऊन परतत आहेत. संस्थानची दर्शन व्यवस्था उत्तम असली तरी काही गेट व द्वारकामाईसारख्या मंदिरामध्ये आवक जावक बंद झाल्याने भाविकांची गावातील वर्दळ कमी झालेली आहे. त्यामुळे अनेक हॉटेलला महिनाभरात भाविकांचा पदस्पर्शही झाला नाही. गुरुवारी व शनिवारी भाविकांची किरकोळ वर्दळ वाढल्याने ज्यांच्याकडे थोडेफार भाविक येतायेत. त्यांतून वीज बिल व कर्मचारी पगारही सुटायला तयार नाहीत, अशी व्यावसायिकांची स्थिती आहे.
थोडी गर्दी वाढून व्यवसायाची कोंडी फुटेल, अशी व्यावसायिकांना आशा असतानाच संस्थानने गर्दी नियंत्रित करण्यासाठी शनिवार, रविवार, गुरुवार व सुटीच्या दिवशी येथील पासेस काउंटर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ ऑनलाइन बुकिंग करून येणारांनाच या दिवशी दर्शन मिळणार आहे. ऑनलाइन पासेस काढणेही सर्वांनाच शक्य व सुकर नसल्याने अनेकजण साईदर्शनाचा मनसुबा रद्द करणार आहेत. मकर संक्रांतीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होत आहे. यामुळे भाविकांच्या गर्दीला ब्रेक लागणार आहे.