खुणावताहेत पाऊलखुणा!
By Admin | Updated: May 28, 2014 00:15 IST2014-05-28T00:10:14+5:302014-05-28T00:15:31+5:30
अशोक निंबाळकर/ योगेश गुंड, अहमदनगर जिथे शिवशाहीची पायाभरणी झाली, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय इतिहासाने ज्या शहराच्या साक्षीने अंग बदलले.
खुणावताहेत पाऊलखुणा!
अशोक निंबाळकर/ योगेश गुंड, अहमदनगर जिथे शिवशाहीची पायाभरणी झाली, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय इतिहासाने ज्या शहराच्या साक्षीने अंग बदलले. काबूल, कंदहारपर्यंतच्या व्यापार्यांना आकर्षिर्या त्या अहमदनगर शहराच्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा राज्यकर्त्यांना प्रेरणा घेण्यासाठी खुणावत आहेत. खापरी नळ योजनेचा अभ्यास केला तरी पाणी प्रश्न मार्गी लागेल. मात्र, यातून प्रेरणा घेणे तर दूरच महापालिकेने स्थापना दिनी साधा कार्यक्रम घेण्याचीही तसदी घेतलेली नाही! अहमदनगर शहर उद्या (बुधवारी) आपला ५२४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. अहमद निजामशहाने बहामनी साम्राज्याचा सेनापती जहांगीर खानावर भिंगार नाल्याजवळ गनिमी काव्याने विजय मिळवला. त्यामुळे त्या जागेवर २८ मे १४९० रोजी कोटबाग निजाम हे लढाईचे स्मारक म्हणून बांधकामास सुरूवात केली. पुढे शहर वसवले. हेच ठिकाण निजामशाहीची राजधानी बनली, असा इतिहास सांगतो. सीना नदी आणि भिंगार नाल्याच्या पाण्यावर या राजधानीची तहान भागणार नाही म्हणून निजामशहाने जवळील डोंगरात तलाव निर्माण केले. बहामनीच्या पदरी गुलबर्गा-बिदरला इराणी तंत्रज्ञ होते. त्यांना निजामशाहीत बोलावून शहर परिसराचे सर्व्हेक्षण केले. त्यांनी तलावातील पाणी खापरी नळाद्वारे शहराला पुरविता येईल, असे सुचविले. तब्बल १३ वाहिन्यांद्वारे शहराला पाणी पुरविले जात. किल्ल्यातील खंदक, तसेच या पाण्यातून हस्त बेहस्तसारख्या बागा फुलविल्या. नागाबाई, शेंडी, कापूरवाडी, पिंपळगाव, वडगाव, इमामपूर, शहापूर आदी जलवाहिन्या त्याची उदाहरणे आहेत. तब्बल १०० मैल म्हणजे नगर-पुणे अंतराएवढे शहरात त्यांचे जाळे होते. पंधरा-वीस नाही तर तब्बल ३०० ते ४०० वर्षे या नळ योजनेच्या पाण्यातून शहराची तहान भागत होती. आजही या योजनेचे भग्न अवशेष वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आहेत. सध्या पुरवठ्यासाठी विविध टाक्या, विद्युत पंप आहेत तरीही पाणी नियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत. नळयोजनेतून निश्चित बोध घेता येईल. त्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा राज्यकर्त्यांना खुणावत आहे. मात्र, राज्यकर्त्यांची ही अनास्था अनाकलनीय आहे.
सर्जेपुरा : शहाजहान बादशाहच्या दरबारी असलेला सरदार सर्जेखानाने नगर शहरात दहा वेशी बांधल्या होत्या. त्याने शहराला नवा ‘लूक’ देण्याचा प्रयत्न केला. त्याचा महाल शहरातील ज्या परिसरात होता तो परिसर आज सर्जेपुरा म्हणून ओळखला जातो. सर्जेखानाचा महाल राहिला नसला तरी त्याचे नाव मात्र आजही परिसरावरून टिकून आहे.
तोफखाना : निजामशाहीतील सरदार रूमीखान शहरातील ज्या परिसरात राहून तोफा बनवत होता. तो परिसर आजचा तोफखाना भाग.
झेंडीगेट : महंमद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त मुस्लीम बांधव ईद साजरी करतात. त्यावेळी याच परिसरातून झेंड्याची मिरवणूक निघत. या ठिकाणी मोठी वेस होती. याला पूर्वी झेंडी दरवाजा म्हटले जाई. झेंड्याच्या मिरवणुकीमुळे या भागाला झेंडी गेट म्हटले जाऊ लागले.
मंगलगेट : औरंगाबादहून अहमदनगर शहरात प्रवेश करण्यासाठी निजामशाहीत येथे मोठी वेस होती. ती आता नामशेष झाली आहे. मंगळवारच्या बाजारामुळे या परिसराला मंगळवार दरवाजा म्हटले जात होते. आता हाच परिसर मंगलगेट म्हणून ओळखला जातो. हातमपुरा : हातीम ताई नावावरून शहरातील एक भागाला हे नाव पडले. आता तो परिसर हातमपुरा नावाने संबोधला जातो.
बंगाल चौकी : माळीवाडा वेशीच्या डाव्या बाजूला शहरात प्रवेश करण्यासाठी एक वेस होती. तिला बोवा बंगाल गेट असे म्हटले जाई. नंतर याच चौकात गस्तीसाठी चौकी बांधण्यात आली. आज ही चौकी बंद आहे.
नालेगाव : शहराच्या पश्चिमेला उताराने पावसाचे पाणी पूर्वी नाल्याच्या स्वरुपात सीनेला मिळत. त्यामुळे नालेगाव म्हणून या भागाची ओळख बनली. आताही हे पाणी अंतर्गत भुयारी नाल्याद्वारे सीनेत येते. 8शहाजी रोड : छत्रपती शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे निजामशाहीत सरदार होते. ते आताच्या अर्बन बँकेजवळील अमृतेश्वर मंदिर परिसरातील वाड्यात वास्तव्यास होते. यामुळे या रस्त्याला त्यांचे नाव दिले गेले.तलावाजवळ उंचवटा निर्माण करायचा. त्यातून उताराच्या बाजूने नळाद्वारे पाणी वाहते ठेवायचे. काही अंतरावर खजिना, विहिरी व पाणी चढविण्यासाठी गरजेनुसार कमी अधिक उंचीचे उच्छवास (उसासे) बांधले जात. चिमणीसारख्या या उसासमधून हवा आत ओढली जात. ती हवा पाणी पुढे ढकलीत नेत. नंतर पुढे शहरात छोट्या नळाद्वारे घरोघरी, मशिदींना, बागांना, कारजांना पाणी पुरविले जाई. -संतोष यादव, अभिरक्षक, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय.