शिर्डीत विखे सावध तर विरोधक आशावादी
By Admin | Updated: June 9, 2014 00:02 IST2014-06-08T23:57:30+5:302014-06-09T00:02:18+5:30
प्रमोद आहेर , शिर्डी लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने अन्य मतदारसंघांच्या तुलनेत शिर्डीत कमी पडझड झाली असली तरी विखे कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाहीत़

शिर्डीत विखे सावध तर विरोधक आशावादी
प्रमोद आहेर , शिर्डी
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने अन्य मतदारसंघांच्या तुलनेत शिर्डीत कमी पडझड झाली असली तरी विखे कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाहीत़ विखेंनी डागडुजीसाठी कंबर कसली आहे, तर विरोधकही मोदी लाटेवर स्वार होण्यास सरसावले आहेत़
शिर्डीत शिवसेनेकडून अभय शेळके निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत़ राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या शेळके यांनी गेल्या वर्षभरात मतदारसंघ पिंजून काढला आहे़ याशिवाय आक्रमक भाषणांमुळे मतदारसंघात परिचित असलेले सेनेचे तालुका प्रमुख कमलाकर कोते, तसेच कोल्हारचे शेखर बोऱ्हाडेही सेनेकडून नशीब आजमावू पाहत आहेत. मनसेकडून विजय काळे यांच्या नावाची चर्चा आहे़ विशेष म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणेही शिर्डीत येण्याबाबत जोरदार चर्चा आहे़
गेल्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील हे शिवसेनेचे डॉ़ राजेंद्र पिपाडा यांच्या विरोधात केवळ तेरा हजारांची आघाडी घेऊन विजयी झाले होते़ त्यावेळी शिर्डी व गणेश परिसर विरोधात गेला असतानाही प्रवरा परिसराने विखे यांना तारले होते. त्यानंतर विखे यांनी कृषी खात्याच्या माध्यमातून विविध विकासकामांचा धडाका लावला़ मात्र नगर-मनमाड रस्ता, बायपास, शिर्डीचा रखडलेला विकास, एफएसआय, एलो झोन वाढवण्याचा मुद्दा, रस्ते,शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छता, हॉटेल व्यवसायिकांचे प्रश्न, राहाता मॉडेल सिटी करण्याची घोषणा आदी प्रश्न आजही प्रलंबितच आहेत़ समाधी शताब्धी व कुंभमेळ्याच्या नियोजनाबद्दल अनास्था, संस्थानात व्यवस्थापन मंडळ नियुक्त होऊ शकले नाही, हे मुद्दे विरोधकांसाठी भांडवल ठरू शकतात.
कृषिमंत्री विखे यांचे चिरंजीव डॉ़ सुजय विखे यांनी ग्रामीण भागात संपर्क वाढवून तरुणांची मोठी फळी उभी केली आहे़ त्याचा फायदा विखे यांना होणार आहे. सुजय विखे हे सहजी उपलब्ध होत असल्याने त्यांनी आपल्या संपर्कातून गावागावातील रस्ते, रोजगारासाठी प्रयत्न, तालुक्यात कृषी विभागाचे सर्वाधिक अनुदान व योजना जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम गेल्या विधानसभा निवडणुकीत मायनसमध्ये असलेले अस्तगाव, सावळेविहीरसारखी गावे मोदी लाटेतही प्लसमध्ये आली. ही नियोजनबद्ध कामांची पावती आहे़ शिर्डी व गणेश परिसरात मात्र विखेंना अद्याप सूर गवसलेला नाही़ भक्तसेवकांना ओळखपत्रे देऊन त्यांनी श्रीगणेशा केला आहे़ विखे यांनी गणेश कारखाना भागीदारी तत्वावर चालवण्याचा घेतलेला निर्णय ही जमेची बाजू आहे़ एकूणच मोदी लाट व काँग्रेस विरोधी वातावरणात विखेंना निवडणूक सोपी नाही, तसेच विखेंसारख्या मातब्बर नेत्याशी झुंज देणे विरोधकांनाही सोपे नाही़