शंकराचार्यांच्या वक्तव्याने शिर्डी संतप्त

By Admin | Updated: June 24, 2014 00:02 IST2014-06-23T23:30:07+5:302014-06-24T00:02:49+5:30

शिर्डी : द्वारकेच्या शंकराचार्यांनी साईबाबांच्या देवत्वावर व ते हिंदू-मुस्लिमांचे प्रतीक असण्याच्या घेतलेल्या आक्षेपावर सोमवारी देशासह शिर्डीतही संतप्त प्रतिक्रिया उमटली.

Shirdi is angry with Shankaracharya's statement | शंकराचार्यांच्या वक्तव्याने शिर्डी संतप्त

शंकराचार्यांच्या वक्तव्याने शिर्डी संतप्त

शिर्डी : द्वारकेच्या शंकराचार्यांनी साईबाबांच्या देवत्वावर व ते हिंदू-मुस्लिमांचे प्रतीक असण्याच्या घेतलेल्या आक्षेपावर सोमवारी देशासह शिर्डीतही संतप्त प्रतिक्रिया उमटली. शिवसेनेने विधान मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
साईबाबांच्या हयातीत अब्दुल बाबा, बडे बाबा, अमीर शक्कर, जव्हार अली, सिद्दी फाळके सारखे हज यात्रा केलेले मुस्लीम साईभक्त होते़ साईबाबांनी शंभर वर्षापूर्वी रामनवमी व उरुस एकाच दिवशी करण्याची प्रथा सुरू केली़ आजही रामनवमीच्या दिवशी मुस्लीम बांधव संदलची मिरवणूक काढतात़ मुख्य म्हणजे रोज सकाळी दहा वाजता सार्इंच्या समाधीवर अब्दुल बाबांचे वंशज फुले वाहतात़ द्वारकामाईत मज्जीदमध्ये बाबांनी आपली हयात घालवली. तेथे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणून केशरी व हिरवा ध्वज लावण्यात येतो़ असे असतानाही शंकराचार्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे शिर्डीकर व साईभक्त व्यथित झाले़
आम्ही साईबाबांचा सदैव आदर करतो, बाबा मोठे संत असून ते हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असल्याचे मत येथील मौलाना असगरअली यांनी व्यक्त केले़ मानव धर्माचा उपदेश करणाऱ्या साईबाबांची सबका मालिक एक ही शिकवणच आज देश एकसंध ठेवण्यास व जातीय सलोखा राखण्यासाठी महत्वाची असल्याचे सांगत संस्थानचे माजी प्रशासकीय अधिकारी सुभाष जगताप यांनी ‘राम आणि रहीम एक, यत्किंचितही नाही फरक, मग भक्तीच धरावी का अटक, वर्तावे तुटक किमर्थ, काय तुम्ही लेकरे मुढ, बांधा हिंदू-अविधांची सांगड, व्हा दृढ सुविचारा रूढ, तरीच पैलथडी पावाल़’ या साईसच्चरित्रातील ओवीचा संदर्भ दिला़
शंकराचार्यांनी साईसच्चरित्राचा अभ्यास करावा व मगच विधान करावे, अशा बेताल वक्तव्याने समाजात तेढ निर्माण होऊ शकते, शंकराचार्यांनी आपले विधान मागे घेतले नाही तर शिर्डीकर व साईभक्तांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख कमलाकर कोते, उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते, नितीन कोते आदींनी दिला़ सिंगापूर येथील भाविक प्रतीक यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बाबांविषयी कोणीही काहीही वक्तव्य केले तरी आमच्या श्रद्धेत फरक पडणार नाही. बाबांची मूर्ती पाहिल्यावर जो आत्मिक आनंद आम्हाला मिळतो तो शब्दात सांगणे कठीण आहे़ यामुळेच आमची बाबांवर नितांत श्रद्धा आहे़(वार्ताहर)
पुतळ्याचे दहन
द्वारकेच्या शंकराचार्यांनी साईबाबांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद शिर्डीत उमटले़ साईबाबांचे समकालीन भक्त तात्या कोते यांचे वंशज निलेश कोते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी शंकराचार्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला़ काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला़
साईबाबा थोतांड आहेत, तसेच शिर्डीत मुस्लीम येत नसल्याने साईबाबा हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक नसल्याचे वक्तव्य शंकराचार्यांनी केले होते़ यामुळे शिर्डीत संतप्त प्रतिक्रिया उमटली़ निलेश कोते यांच्या नेतृत्वाखाली नगर-मनमाड महार्गावर संस्थानच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर शंकराचार्यांचा पुतळा जाळण्यात आला़
कोते म्हणाले की, बेताल आरोप करणारा हा फॅसिस्ट माणूस आहे, हायप्रोफाईल असलेला हा माणूस ए़सी़ मध्ये फिरतो, बाबांचे तसे नव्हते. ते शिर्डीत फकीर म्हणून राहिले. त्यांच्यावर करोडो भाविकांची श्रद्धा आहे़ पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा.
हे सर्वधर्म समभावाचे ठिकाण आहे़ साठ वर्षे बाबांनी येथे एका पडक्या मस्जीदमध्ये वास्तव्य केले़ लाखो भाविकांची बाबांवर निस्सीम श्रद्धा आहे़ संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करून श्रद्धेला तडा देण्याचे काम कुणीही करु नये. बाबांच्या जीवनावर आधारित साईसच्चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय बाबांचे महत्व कळणार नाही.
-जयंत ससाणे,
संस्थानचे माजी अध्यक्ष.

Web Title: Shirdi is angry with Shankaracharya's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.