उन्हाळ्यात नदीला येतोय पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:31+5:302021-06-02T04:17:31+5:30
सोमवारी रात्री १० वाजता ५५ दशलक्षघनफूट क्षमतेचा धामणगावपाट कोल्हापूर बंधारा अचानक ओहरफ्लो झाला, तर कोतूळचे दोन जिल्हा परिषद ...

उन्हाळ्यात नदीला येतोय पूर
सोमवारी रात्री १० वाजता ५५ दशलक्षघनफूट क्षमतेचा धामणगावपाट कोल्हापूर बंधारा अचानक ओहरफ्लो झाला, तर कोतूळचे दोन जिल्हा परिषद व कोतूळ पुलाजवळचा ३५ दशलक्ष घनफूट बंधारा भरून पिंपळगाव खांड धरणात पाणी सकाळी १० वाजता झेपावले. जवळपास १०० दशलक्ष घनफूट पाणी मुळेच्या उगमावर कुठलाही पाऊस नसताना किंवा शेतकऱ्याची मागणी नसताना अचानक आलेच कसे ?
पाडाळणे, धामणगावपाट, कोतूळ, मोग्रस, पांगरी, अंबित, बलठण, कोथळा या गावांसाठी हक्काची तीन आवर्तने मिळण्यासाठी नेते, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे उंबरे झिजवतात. आवर्तन धामणगावपाटपर्यंत येऊन थांबते. पुढे कोतूळ, धामणगावपाट, मोग्रस या तीन गावांतील शेतकरी कायम कोरडे राहतात. यंदा मात्र कोणतीही मागणी नसताना नदी वाहती झाली आहे. विशेष म्हणजे याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना दिलेली नाही.
सध्या कोतुळात कोतूळ पुलाचे काम चालू आहे. काम लवकर सुरू व्हावे म्हणून मार्च महिन्यात पाणी सोडायचे होते तेव्हा चांगलेच राजकीय नाट्य घडले. धरणाच्या खालचे व धरणातले शेतकरी पाणी सोडायला विरोध करत होते. यापूर्वी सहा वर्षांत चार वेळा धरण रिकामे केले, मात्र एकही शेतकरी पुढे आला नाही. पुलाचे कामासाठी १५ ते २० जूनला नदीला पाणी येऊ शकते या गृहितकावर रात्रंदिवस पुलाचे काम चालू आहे. मात्र अचानक आलेल्या पुराने हे काम आणखी वर्षभर लांबणार आहे. यावरून हा पूर राजकीय, नैसर्गिक, की प्रशासकीय? असा सवाल निर्माण झाला आहे.
.....
पाटबंधारेच्या अधिकारी अंधारात
अकोले पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी. जी. नानोर यांच्याशी संपर्क साधला असता पाणी आल्याबाबत माहिती नाही. तुम्ही खालच्या अधिकाऱ्यांना विचारा असे उत्तर दिले. कोणताही पाऊस झाला नाही किंवा बंधारा रिकामा केला नाही. अंबितच्या गेटचे काम चालू असल्याने पाणी सोडले आहे.
................