स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांचीही..
By Admin | Updated: December 15, 2015 23:14 IST2015-12-15T23:00:23+5:302015-12-15T23:14:36+5:30
अहमदनगर: नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक नाहीत, असा जो आरोप केला जातो, तो सपशेल चुकीचा आहे़ स्वच्छतेबाबत नागरिक जागृत आहेतच़ त्यांना स्वच्छता हवी आहे

स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांचीही..
अहमदनगर: नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक नाहीत, असा जो आरोप केला जातो, तो सपशेल चुकीचा आहे़ स्वच्छतेबाबत नागरिक जागृत आहेतच़ त्यांना स्वच्छता हवी आहे आणि त्यासाठी स्वत: ही जबाबदार आहेत, अशी ८० टक्के नागरिकांची मानसिकता असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे़
शहर स्वच्छतेबाबत ‘लोकमत’ कडून मंगळवारी शहरासह उपनगरांत सर्वेक्षण करण्यात आले़ सर्वेक्षणात नागरिकांना एकूण पाच प्रश्न विचारण्यात आले होते़ स्वत:चे घर, अंगण, कॉलनी आणि शहर स्वच्छतेबाबत नागरिकांना काय वाटते, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला़ नागरिकांना पाच प्रश्न विचारले गेले़ या पाचही प्रश्नांची उत्तरे होय किंवा नाही, अशाच स्वरुपात दिली़ स्वत: चे घर स्वच्छ ठेवता का? या प्रश्नाचे १०० टक्के नागरिकांनी ‘होय’ असे उत्तर दिले आहे़ आपण आपले अंगण स्वच्छ ठेवता का? या प्रश्नावर १०० टक्के नागरिकांनी ‘होय’ अंगण स्वच्छ ठेवतो, असे उत्तर दिले़ घरासोबतच शहरातील १०० टक्के नागरिक आपण राहत असलेली कॉलनी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात़ कॉलनीतील कचऱ्याची विल्हेवाट लावता का? या प्रश्नावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही, असेही नागरिकांकडून सांगण्यात आले़ कॉलनीतील कचऱ्याची विल्हेवाट लावतो, असे उत्तर देणाऱ्या नागरिकांची टक्केवारी ८० टक्के आहे़ तर कचऱ्याची विल्हेवाट लावत नाही, अशी स्पष्ट कबुलीच २० टक्के नागरिकांनी दिली़
स्वच्छ भारत अभियानही सध्या जोरात आहे़ या अभियानांतर्गत सप्तपदींची शपथही नागरिकांना दिली गेली़ शहरात स्वच्छता दूत नेमण्यात आले़ स्वच्छतेनिमित्त अनेक कार्यक्रमही घेण्यात आले़ पण, शहरातील कचऱ्यांचे ढीग अद्याप ओसरलेले नाहीत़ स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनाची आहे़ स्वच्छतेबाबत नागरिक जागृक नाहीत, असा सूर प्रशासनात आहे़ प्रत्यक्षात मात्र वेगळी स्थिती आहे़ नागरिक स्वच्छतेबाबत जागृत आहेत़ शहरातील असस्वच्छतेला नागरिकही जबाबदार आहेत, तशी कबुलीही ८० टक्के नागरिकांनी दिली आहे़ तर १० टक्के नागरिकांना हा प्रश्न निटसा समजला नाही़ त्यांनी या प्रश्नावर सांगता येत नाही, असे उत्तर दिले असून, अस्वच्छतेला नागरिक जबाबदार नाहीत, असे १० टक्के नागरिकांचे मत आहे़
(प्रतिनिधी)