२२० कोटींच्या कर्जाचा ठराव
By Admin | Updated: June 26, 2014 00:43 IST2014-06-25T23:41:09+5:302014-06-26T00:43:03+5:30
राहुरी : राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे सहकारी साखर कारखान्याला कर्जाच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळ सरसावले आहे.

२२० कोटींच्या कर्जाचा ठराव
राहुरी : राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे सहकारी साखर कारखान्याला कर्जाच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळ सरसावले आहे. त्यानुसार मंगळवारी झालेल्या संचालकांच्या बैठकीत विदेशी कं पनीकडून २२० कोटींचे कर्ज मिळविण्यासंदर्भात ठराव पारीत करण्यात आला़
आर्थिक अडचणीत सापडलेला तनपुरे कारखाना संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्ज मिळावे म्हणून संचालक मंडळ प्रयत्नशील होते़ त्या विषयाच्या अनुषंगाने संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत विदेशी कंपनीकडून कर्ज घेण्याबाबत चर्चा झाली. त्यावर २२० कोटींचे कर्ज उचलण्याचा ठरावही बैठकीत पारीत करण्यात आला. कारखान्याची जमिनीसह मालमता गहाण ठेऊन कर्ज उपलब्ध करण्याचे सर्व अधिकार कारखान्याचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांना देण्यात आले आहेत. बैठकीला ११ संचालकांनी हजेरी लावली.
कर्ज उपलब्ध झाल्यानंतर कामगारांचे पगार, ऊस उत्पादकांचे पेमेंट व अन्य देणी देण्यात येणार आहे़ कारखान्याची २८१ कोटी रूपयांची मालमत्ता आहे़ प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी विदेशी कर्ज घेणे गरजेचे असून सर्वांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरणार असल्याचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांनी सांगितले़ विरोधी शेतकरी मंडळाचे संचालक शिवाजीराव गाडे यांनीही सत्ताधारी गटाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
(तालुका प्रतिनिधी)
कर्ज उपलब्ध झाल्यानंतर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे़ यंदा राहुरी तालुक्यात दहा लाख टन ऊस उपलब्ध आहे़ यंदाच्या हंगामात जास्तीत जास्त गाळप करण्याचा संचालक मंडळाचा संकल्प आहे़ कर्जासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे कारखाना उर्जितावस्थेत आणण्यास मदत होणार आहे़
- सुरेश वाबळे,
उपाध्यक्ष,
तनपुरे कारखाना