निकृष्ट बाजरी बियाणाचा अहवाल रखडला; खडकवाडी, कामठवाडीच्या शेतक-यांना आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:13 IST2019-10-23T13:10:35+5:302019-10-23T13:13:14+5:30
स्प्रिंहा कंपनीचे एस ३०१ बाजरी बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यामुळे कणसाला अत्यल्प दाणे भरल्याने पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडीमधील सुमारे ४० ते ४५ शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत कृषी अधिका-यांच्या चौकशी समितीचा अहवाल रखडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

निकृष्ट बाजरी बियाणाचा अहवाल रखडला; खडकवाडी, कामठवाडीच्या शेतक-यांना आर्थिक फटका
विनोद गोळे ।
पारनेर : स्प्रिंहा कंपनीचे एस ३०१ बाजरी बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यामुळे कणसाला अत्यल्प दाणे भरल्याने पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडीमधील सुमारे ४० ते ४५ शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत कृषी अधिका-यांच्या चौकशी समितीचा अहवाल रखडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडी येथील शेतक-यांनी स्प्रिंहा बायोस्कील कंपनीचे एस-३०१ बाजरी बियाणे घेऊन पेरणी केली होती. मात्र या बाजरीच्या कणसांमध्ये दाणे कमी प्रमाणात भरल्याचे शेतक-यांच्या लक्षात आले. शेतक-यांनी याबाबत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे प्रमुख संतोष वाडेकर, प्रवक्ते राजेंद्र रोकडे यांच्याकडे ही माहिती दिली.
वाडेकर, रोकडे यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना सांगितल्यावर १५ आॅक्टोबर रोजी उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ एन. एस. उगले, महाबीजचे पुरुषोत्तम फाटे, मंडल कृषी अधिकारी व्ही. एन. पवार, पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही. एन. उघडे यांची चौकशी समितीने प्रत्यक्ष शेतक-यांच्या शेतात जाऊन बाजरी पिकाची व कणसाची पाहणी केली. त्यानंतर दोन दिवसात अहवाल येऊन बियाणे निकृष्ट असेल तर शेतक-यांना नुकसान भरपाई मिळेल, असे समितीने सांगितले होते.
चौकशी समितीसमोर फिरवला पिकांवर रोटावेटर
कामठवाडी, खडकवाडी परिसरातील शेतकºयांनी बाजरीच्या पिकावर रोटावेटर फिरवला. यावेळी शेतकºयांना आपले अश्रू अनावर झाले. पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडी परिसरातील शेतक-यांच्या त्या बाजरी पिकांचे नमुने घेतले आहेत.
अहवाल आल्यानंतर निर्णय
दोन दिवसात अहवाल येईल. चौकशी समितीचा अहवाल अद्याप आमच्याकडे आलेला नाही. आम्ही शेतक-यांसाठीच आहोत. अहवाल आल्यानंतर निर्णय होईल, असे कर्नाटक येथील कंपनीचे विभाग अधिकारी प्रसाद व उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी सांगितले.