भरती केवळ गुणवत्तेवरच
By Admin | Updated: July 6, 2014 00:19 IST2014-07-05T23:14:49+5:302014-07-06T00:19:08+5:30
अहमदनगर : लष्कर भरती केवळ आणि केवळ गुणवत्तेवर होत असून, उमेदवारांनी दलालापासून सावधान राहावे. सर्व प्रक्रिया संगणकीय असून, कोणालाही यात हस्तक्षेप करणे अशक्य आहे.
भरती केवळ गुणवत्तेवरच
अहमदनगर : लष्कर भरती केवळ आणि केवळ गुणवत्तेवर होत असून, उमेदवारांनी दलालापासून सावधान राहावे. सर्व प्रक्रिया संगणकीय असून, कोणालाही यात हस्तक्षेप करणे अशक्य आहे. जो तयारीनिशी आला, त्याची गुणवत्ता निश्चितच दिसेल. त्यामुळे कोणी पैशाच्या बदल्यात नोकरीचे आमिष दाखवत असेल, त्याची त्वरित तक्रार करावी, असे आवाहन कर्नल मनिष गुप्ता यांनी केले.
गेल्या चार दिवसांपासून येथील पोलीस परेड मैदानावर कर्नल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शंभरहून अधिक अधिकारी अहोरात्र लष्कर भरती प्रकिया राबवत आहेत. ‘लोकमत’ने कर्नल गुप्ता यांच्याशी खास बातचीत केली. त्यात त्यांनी भरती प्रक्रियेचे टप्पे, संगणकीय कामकाज, देशभरातील लष्कराच्या विविध विभागांतून आलेले अधिकारी व उमेदवारांच्या जनजागृतीसाठी काही उपाययोजना विषद केल्या. पैसे देऊन भरती करतो, या आमिषाला उमेदवार भुलतात. सर्व सुविधांयुक्त केंद्र शासनाची नोकरी आणि तिही लष्करात म्हटल्यावर पालकांच्या आनंदाला पारावार राहत नाही. मुलाच्या नोकरीसाठी डोळे झाकून ते मागेल तेवढे पैसे देण्यासाठी तयार होतात. परंतु जेव्हा मुलगा लष्करी चाचण्यांत अनुत्तीर्ण होतो, तोपर्यंत पैसे घेऊन दलाल फरार झालेला असतो, त्यावेळी पश्चातापाशिवाय काही उरत नाही. भरती प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी वेगवेगळ्या झोनचे आहेत. ज्याला त्याला नेमून दिलेले काम तो करतो. त्यामुळे कोणी एक अधिकारी यात सामील झाला असे गृहित धरले तरी, इतर ९९ जणांपासून तुम्ही कसे वाचणार, असा सवाल करत कर्नल गुप्ता यांनी प्रक्रियेत घुसखोरी करण्यास कोणताही वाव नसल्याचे ठामपणे सांगितले. मैदानी चाचण्यांनंतर होणाऱ्या लेखी परीक्षेला यापेक्षाही मोठ्या दिव्यातून जावे लागते. यासाठीची उत्तरपत्रिका दिल्ली हेडक्वॉर्टरमधून बाहेर पडते. त्यावर उमेदवाराच्या नावाऐवजी बारकोड सिस्टीम असते. तर उत्तरपत्रिका संगणकाद्वारे तपासली जाते. त्यामुळे हस्तक्षेपाला मार्ग उरत नाही. मैदानी चाचणीपासून ते थेट लेखी परीक्षेपर्यंत उमेदवाराला क्षमता सिद्ध करावी लागते. पैसे घेऊन जर कोणी भरतीचे आमिष दाखवत असेल तर ती शुद्ध फसवणूक आहे. ओळखीचा असो वा अनोळखी उमेदवारांनी एक रूपयाही कोणाला देऊ नये, असे आवाहन गुप्ता यांनी केले. (प्रतिनिधी)
लष्करी प्रक्रियेत खूप पारदर्शकता असते. एकतर सर्व कामकाज संगणकीय झालेले आहे. चाचण्यांच्या सर्व टप्प्यांत उमेदवाराला त्याची बायोमेट्रिक (थम्ब इंप्रेशन) ओळख पटवावी लागते. त्यामुळे गुणवत्तेशिवाय मार्ग नाही.
-कर्नल मनिष गुप्ता