रब्बीला कुकडीने ताणले, जलयुक्तने तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:53+5:302021-02-05T06:35:53+5:30
कर्जत : मजुरांची टंचाई व हमीभाव याचा विचार करून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी गहू, हरभरा व कांदा यांना ...

रब्बीला कुकडीने ताणले, जलयुक्तने तारले
कर्जत : मजुरांची टंचाई व हमीभाव याचा विचार करून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी गहू, हरभरा व कांदा यांना प्राधान्य दिले आहे. यामुळे या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे तर ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. कुकडीच्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन केले. मात्र अद्याप कुकडीचे एकही आवर्तन आले नाही. मात्र, यंदा जलयुक्त शिवारमधील कामांमुळे अद्याप तरी ही पिके तरली आहेत. आता सूर्य तळपू लागला आहे. त्यामुळे कुकडीच्या आवर्तनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे.
कर्जत हा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो. गेल्या दहा-बारा वर्षात कर्जत तालुक्याला कुकडीचे आवर्तन नियमितपणे येत आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील बागायती क्षेत्र वाढले आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपली शेती बागायती केली आहे. पूर्वी शेती होती. पण तिला पाणी उपलब्ध नव्हते. अलीकडील काळात सिंचनाखालील शेती वाढली आहे. यामुळे कोरडवाहू शेतकरी बागायतदार झाले. शेतकऱ्यांनी हरभरा व गहू या पिकांना प्राधान्य दिले. तसेच कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे हरभरा, गहू व कांदा या पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. गेल्या पावसाळ्यात कर्जत तालुक्यातील विविध भागात समाधानकारक पाऊस झाला होता. शिवाय कुकडीचे पाणी येते. त्यामुळे यंदा नगदी पिकांकडे शेतकरी वळल्याचे दिसत आहे. प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात कुकडी व घोडची दोन आवर्तने सुटत असतात. पण यावर्षी एकही आवर्तन आले नाही. ज्वारीचे पीक काढायला आले, हरभरा व गव्हाचे दाणे भरत आहेत तरी कुकडीचे आले नाही. उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. त्यामुळे पिके सुकत असून, कुकडी व घोडचे आवर्तन सोडने गरजेचे आहे.
याशिवाय रब्बी पिकांना हवामानाचा फटका बसू शकतो, अशी शक्यता आहे. हरभरा पिकावर घाटे आळी आली आहे. मजुरांच्या समस्येमुळे फळबागा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. राज्य सरकारने फळबागा लागवडीची मुदत वाढवून दिली आहे, गरजूंनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी केले आहे.
.............................
कर्जत तालुक्यातील पीकनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)
ज्वारी - ४१५९८, मका - ४२८५, ऊस - ११५२८, कांदा - १०५०४, गहू - ९५७४, हरभरा - १४९८६, फळबागा - ६७३०, भाजीपाला - १२३३७, चारापिके - ४६५१, तेलबिया - ४३.
(फोटो - कर्जत तालुक्यातील खातगाव शिवारात बहरलेले गव्हाचे पीक)