सतरा गावात विकासाची समृद्धी
By Admin | Updated: July 5, 2014 00:32 IST2014-07-04T23:24:56+5:302014-07-05T00:32:40+5:30
बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या नगर जिल्ह्यातील १७ मोठ्या गावांना विविध विकास कामांसाठी ३ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
सतरा गावात विकासाची समृद्धी
बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या नगर जिल्ह्यातील १७ मोठ्या गावांना विविध विकास कामांसाठी ३ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे हरित गावामध्ये आता विकास कामांची समृद्धी नांदणार आहे.
१० हजार पेक्षा जादा लोकसंख्या असलेल्या १७ ग्रामपंचायतीची विकास कामे करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये बेलवंडी (ता.श्रीगोंदा), सुरेगाव, संवत्सर, शिंगणापूर (ता. कोपरगाव), पुणतांबा, लोणी वाकडी (ता. राहाता), बेलापूर, निपाणी वडगाव (श्रीरामपूर), वांबोरी (ता. राहुरी), नागरदेवळे (ता. नगर), पारनेर व निघोज (ता. पारनेर), राशीन, कर्जत, मिरजगाव (ता. कर्जत), घुलेवाडी (ता.संगमनेर) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे़
निवडलेल्या १७ ग्रामपंचायतींनी गावात वृक्षारोपन, वृक्ष संवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम प्रभावीपणे राबविली. गावात हरितपट्टे तयार केले. या गावांचा सन्मान करण्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी देण्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला.
गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था देऊळगाव राजा व हर्षल ग्रामीण संस्था, चंद्रपूर या संस्थांनी १७ गावांमध्ये विकास कामाचा सर्व्हे केला आणि शासनाला अहवाल सादर केला. पहिल्या टप्प्यात सांडपाणी व्यवस्थापन, भुयारी गटार, दुसऱ्या टप्प्यात रस्ते, पथदिवे, वृक्षारोपन आदी कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलणार आहे.
बेलवंडी ग्रामपंचायतीने पर्यावरण संतुलित योजना राबविली. गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले़ त्यामुळे सरकारने या कामाची दखल घेतली असून, गावच्या विकासासाठी मोठी निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे विकास कामांना गती मिळणार आहे. यातून गावाचा कायापालट होण्यास मदत होईल़
-सरस्वती डाके
सरपंच, बेलवंडी