मार्केटपेक्षा रस्त्यावर भाजीपाल्याचा भाव दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:00+5:302021-07-30T04:22:00+5:30
------------ लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये १० रुपये, २० रुपये किलो मिळणारा भाजीपाला किरकोळ बाजारात मात्र ...

मार्केटपेक्षा रस्त्यावर भाजीपाल्याचा भाव दुप्पट
------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये १० रुपये, २० रुपये किलो मिळणारा भाजीपाला किरकोळ बाजारात मात्र दुप्पट भावाने मिळतो. त्यात मार्केट परिसरासह एकवीरा चौकात ग्राहकांना परवडणारे दर आहेत. चितळे रोड, प्रोफेसर चौक आदी परिसरात भाजीपाल्याचे दर जास्तच आहेत. फ्लावर, घोसाळे, कोबी, दोडका या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर असली तरी या भाज्यांचा किरकोळ बाजारातील दर ४० ते ५० रुपये असा आहे. नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्रीला येतो. इथे पहाटेपासूनच भाजीपाल्यांचे, फळांचे लिलाव होतात. ठोक विक्रीसाठी इथे मोठी गर्दी होते. ठोक बाजारात स्वस्त किमतीत भाजीपाला मिळत असल्याने किरकोळ ग्राहकही बाजार समिती परिसरात गर्दी करतात. जुना मंगळवार बाजार, गाडगीळ पटांगण, एकवीरा चौक, चितळे रोड, भिस्तबाग आदी परिसरात बाजार भरतो. प्रत्येक ठिकाणी तीन ते चार रुपयांचा फरक असतो.
-----------
हा बघा फरक (प्रतिकिलो)
भाजी भाजी मार्केट घराजवळ
टोमॉटो १० २०
वांगी २० ४०
फ्लावर २० ४०
कोबी १० २०
काकडी १० ३०
गवार ६० १००
दोडका १० ४०
कारले २० ५०
भेंडी १५ ४०
मिरची २५ ५०
-----------------------
दोडका एकवीरा चौकात ४० रुपये, प्रोफेसर चौकात ६० रुपये
सध्या दोडका मोठ्या प्रमाणावर विक्रीस आला आहे. साधारणपणे मार्केटमध्ये १० रुपये किलो दोडका मिळतो. प्रोफेसर चौकात ६० ते ८० रुपये किलो, तर एकवीरा चौकात ४० रुपये किलो मिळतो. कोबी, फ्लावर या भाज्यांच्या दरातही कमालाची तफावत दिसते.
-------------
पिकवतात शेतकरी, माल मात्र जास्तीचा पैसा तिसऱ्याच्या हातात
शेतकरी मोठ्या कष्टाने पालेभाजी पिकवतात. मात्र ते बाजार समितीमध्ये किरकोळ दरामध्ये विकतात. दुसरेच हा माल खरेदी करून किरकोळ बाजाराच दुप्पट ते तिप्पट दराने विकतात. शेतकऱ्यांऐवजी तिसऱ्यांच्याच हाती पैसा जातो. यामुळेच शेतकरी अधिक गरीब होत आहे, अशी प्रतिक्रिया निघोज येथील कृषीमित्र संकेत लाळगे यांनी दिली.
-------------
एवढा फरक कसा.....
पहाटे उठून बाजारात जातो. तिथे लिलावाद्वारे माल घेतो. या मालाची वाहतूक करण्यासाठी वाहन भाड्याने असते. काहींचे वाहन स्वत:चे असले तरी पेट्रोल-़डिझेलचे दर वाढल्याने वाहनभाडे वाढलेले आहे. शिवाय दिवसभर रस्त्यावर बसावे लागते. त्यामुळे हा सर्व खर्च काढणेही शक्य नसते.
- भाजी विक्रेते, प्रोफेसर चौक
-------------
लॉकडाऊनमध्ये माझा रोजगार गेला आहे. त्यामुळे आता भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. भाजी विकण्यासाठी दिवसभर एकाच जागेवर बसावे लागते. त्यात भाजी ताजी असताना विकली तर फायदा होतो. भाजी सुकली तर कमी भावाने द्यावी लागते. हा तोटा सहन करावा लागतो. हा तोटा भरून काढण्यासाठी भाज्यांमध्ये दरवाढ होते.
-भाजी विक्रेते, एकवीरा चौक
-------------