जनताच ‘ईडी’ची बिडी करून फुंकतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST2020-12-27T04:15:58+5:302020-12-27T04:15:58+5:30
अहमदनगर : भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. ...

जनताच ‘ईडी’ची बिडी करून फुंकतील
अहमदनगर : भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. मात्र, कोणीही सत्तेचा मुकुट घेऊन आलेला नाही. केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करणाऱ्या भाजपविरुद्ध लोक चिडतील आणि ईडीची बिडी करून फुंकतील, अशा शब्दात राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर यांनी भाजपला इशारा दिला.
ओबीसी समाजाच्या मेळाव्यासाठी वडेट्टीवार शनिवारी नगरमध्ये होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजप हा मुळात भांडवलदारांचा पक्ष आहे. त्यांना फक्त व्यापारी आणि भांडवलदारांचे हित जपायचे आहे. त्यांना अन्य घटकांशी काहीही देणे- घेणे नाही. उलट राजकारणात बहुजनांना मोठे होऊ न देण्याचे त्यांचे धोरण आहे. जर कोणी मोठा होत असेल तर त्याची कोंडी केली जाते. बदला घेण्याची वाईट प्रथा भाजपने राजकारणात आणली आहे. मतभेदाऐवजी मनभेद वाढले आहेत. मात्र, जे पेराल ते उगवणार आहे, हे भाजपने लक्षात घ्यावे. विविध राज्यांतील बहुमताचे सरकार पाडणे ही लोकशाही पायदळी तुडविण्याचा प्रकार आहे.
मराठा आरक्षणसंबंधीच्या मंत्रिगटाच्या उपसमितीचा अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता वडेट्टीवार म्हणाले, मेटे हे पक्के राजकारणी आहेत. माध्यमांसमोर येऊन प्रसिद्धीत राहायचे, एवढ्यासाठीच ते बोलतात. पाहिजे तो निकाल लावायला चव्हाणांच्या हातात काय कोर्ट आहे का? चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत जे काम केले ते आतापर्यंत कोणीही केलेले नाही. मेटे यांची भूमिका राजकीय प्रेरित आहे. अन्यथा शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत काय घोळ केले, हे आम्हाला सांगावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा योग्य समन्वय आहे. जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्रच आहोत. मान- समान कार्यक्रमात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. अजित पवार हे शिवसेनेला सोबत घेण्याबाबत बोलले असले तरी त्याचा अर्थ काँग्रेससह सेनेला सोबत घेऊ असाच आहे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
-----------
घाण्यापासून तेलाचे क्लस्टर
बाजारात मिळणारे तेल खाऊन हृदयरोग वाढले आहेत. तरुणांचा जीव जातो आहे. त्यामुळे घाण्यापासून तेल तयार करण्याचे क्लस्टर आम्ही विदर्भात करीत आहोत. यामुळे आरोग्यासोबतच पाच हजार तरुणांना रोजगार
देता येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. वसंतराव नाईक विकास महामंडळासाठी निधी वाढवून दिला आहे. याशिवाय बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यासाठी सरकार काम करीत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.