पाणीवाले बाबा दगडू लहारे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST2021-07-14T04:25:18+5:302021-07-14T04:25:18+5:30
राहुरी : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणण्यात सिंहाचा वाटा असलेले व बारागाव नांदूरसह १४ गाव पाणीपुरवठा योजनेचे ...

पाणीवाले बाबा दगडू लहारे यांचे निधन
राहुरी : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणण्यात सिंहाचा वाटा असलेले व बारागाव नांदूरसह १४ गाव पाणीपुरवठा योजनेचे जनक दगडू नारायण लहारे (वय ९१) उर्फ पाणीवाले बाबा यांचे वृद्धापकाळाने वळण पिंपरी (ता.राहुरी) येथे निधन झाले. त्यांच्यापश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. राधेश्याम लहारे यांचे ते वडील होत.
राहुरी येथे कृषी विद्यापीठाची स्थापना व्हावी, म्हणून लहारे यांनी त्यावेळी जनजागृती केली होती. सर्वप्रथम स्वतःची जमीन विद्यापीठासाठी दिली होती. त्यानंतर, इतरांनी जमिनी दिल्या. त्यामुळे विद्यापीठ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मुळा नदीकाठी असलेल्या १४ गावांना मुळा धरणातून पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी सायकलवर फिरून त्यांनी ग्रामपंचायतींचे ठराव घेतले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व ज्येष्ठ विधिज्ञ दिवंगत राम जेठमलानी यांच्या उपस्थितीत पाणी परिषदेचे आयोजन केले होते. मुळा धरणाचे पाणी मिळाल्याशिवाय दाढी करणार नाही व पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. बारागाव नांदूर पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लागल्याने लहारे यांना पाणीवाले बाबा म्हणून संबोधले जाऊ लागले. संत गाडगे महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन लहारे यांनी गावोगावी स्वच्छता अभियान राबविले होते, तसेच तालीम व शाळा सुरू केली होती. तत्कालीन सामाजिक व न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते राहुरी भूषण पुरस्कार देऊन लहारे यांना गौरविण्यात आले होते.
........
१२ दगडू लहारे
120721\img-20210712-wa0013.jpg
ज्येष्ठ समाजसेवक पाणी वाले बाबा दगडू पाटील लहारे यांचे वृद्धापकाळाने निधन