घारगाव : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात शुक्रवारी (१६ जुलै) सकाळच्या सुमारास दरड कोसळली. यात छोटे-छोटे दगड या ठिकाणच्या डोंगरमाथ्यावरून नाशिक-पुणे लेनवर पडले होते. काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती.
सिन्नर ते खेड असे चौपदीकरण झाल्याने डोंगर फोडून धोकादायक वळणे काढण्यात आली. त्यासाठी सुरूंगाचा वापर करण्यात आल्याने डोंगरांना तडे गेले आहेत. त्यात पावसाळ्यात पावसाचे पाणी झिरपते.त्यामुळे अनेक छोटे-मोठे दगड सुट्टे होतात. संगमनेर तालुक्यात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने शनिवारी सकाळी सात वाजलेच्या सुमारास छोटे-छोटे दगड नाशिक -पुणे लेनवर पडले. याबाबत माहिती समजताच डोळासने पोलीस मदत केंद्राचे अरविंद गिरी यांसह हिवरगाव टोल प्लाझाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत हे दगड महामार्गाच्या बाजूला केले.व वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान , दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात सुरक्षा जाळ्या तुटून मोठे मोठे दगड महामार्गावर येऊन पडल्याने नाशिककडे जाणारा रस्ता बंद झाला होता. ही वाहतूक इतर ठिकाणाहून वळविण्यात आली होती.आठवड्यात तीन वेळा दरड कोसळली होती. लाखो रुपये खर्चून सुरक्षा जाळ्या बसवण्यात आल्या. तरीही दरडी कोसळत असल्याने घाट परिसरातून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो आहे.