जेऊर हैबती येथील मयत व्यक्तीला बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:35+5:302021-07-22T04:14:35+5:30
कुकाणा : नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील बेकायदा गोैण खनिज उत्खनन व वाहतूक केल्या प्रकरणी नेवाशाच्या महसूल यंत्रणेने या ...

जेऊर हैबती येथील मयत व्यक्तीला बजावली नोटीस
कुकाणा : नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील बेकायदा गोैण खनिज उत्खनन व वाहतूक केल्या प्रकरणी नेवाशाच्या महसूल यंत्रणेने या प्रकरणात महिनाभरापूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला नोटीस बजावली आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेकडून गौण खनिज चोरी प्रकरणी चौकशी व त्यानंतरही कारवाईच संशयास्पद ठरू लागली आहे.
जेऊर हैबती येथील काही ग्रामस्थांनी येथीलच रामबाबा देवस्थानच्या परिसरातील शासकीय जागेतील मुरूम व माती असे गौण खनिज चोरी झाले, अशी लेखी तक्रार २३ जून रोजी माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब फुलमाळी यांनी नेवासा तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन तहसीलदारांनी कुकाणा मंडलाधिकाऱ्यांना जागेची पाहणी व पंचनामा करून अहवाल देण्याचे आदेश दिले. त्यानुसार कुकाणा मंडलाधिकाऱ्यांनी २९ जून २०२१ रोजी उत्खननाचा पंचनामा करून त्याचा अहवाल नेवासा तहसीलदारांना सादर केला होता. त्यानुसार तहसीलदारांनी यातील संबंधित व्यक्ती अकबर बाबुभाई सय्यद (रा. जेऊर हैबती, ता. नेवासा) यांना ३० जून २०२१ रोजी खुलासा नोटीस बजावली. मात्र त्यांचा ६ जून २०२१ रोजीच मृत्यू झालेला आहे. कुकाणा मंडल अधिकाऱ्यांनी २९ जून रोजी पंचनामा करून अहवाल सादर केला. मंडल अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार ३० जून २०२१ रोजी तहसीलदारांनी ही नोटीस बजावली. नोटीस बजावलेल्या व्यक्तीचा मृत्यू होऊन जवळपास महिन्याचा कालावधी उलटला असतानाही त्याच व्यक्तीला नोटीस बजावणे म्हणजे अजबच प्रकार आहे.
---
तहसीलदार
तक्रार अर्ज व पंचनाम्यामध्ये नाव असल्याने त्या व्यक्तीच्या नावे नोटीस काढण्यात आली होती. जोपर्यंत मृत्यूची नोंद होत नाही, तोपर्यंत त्याच व्यक्तीच्या नावे नोटीस काढण्यात येते. जेऊरच्या तलाठ्याने संबंधित व्यक्ती मयत असून त्याच्या वारसाला (मुलाला) ७ जुलै रोजी नोटीस बजावण्यात आल्याचा अहवाल तलाठ्याने सादर केलेला आहे.
रूपेशकुमार सुराणा, तहसीलदार, नेवासा
----
येथील श्री रामबाबा मंदिर परिसरातील १५० ते २०० ब्रास मातीचे अवैध उत्खनन झाले. त्याबाबत नेवासा तहसीलदारांना संबंधित व्यक्तींची नावे दिलेली आहेत. अकरापैकी फक्त एकाच मयत व्यक्तीला नोटीस बजावण्यात आलेली आहे. इतर व्यक्तींना नोटीस बजावण्यात यावी, अन्यथा गावबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब फुलमाळी यांनी दिला.