लोखंडेंच्या विजयामुळे उत्तर-दक्षिण मनोमिलन
By Admin | Updated: May 26, 2014 00:24 IST2014-05-25T23:59:34+5:302014-05-26T00:24:04+5:30
अहमदनगर: जिल्ह्याच्या उत्तर भागातील शिर्डी मतदारसंघाची खासदारकी ही सदाशिव लोखंडे यांच्या रुपाने एकप्रकारे दक्षिणेला मिळाली असल्यामुळे उत्तर-दक्षिण मनोमिलनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पडले

लोखंडेंच्या विजयामुळे उत्तर-दक्षिण मनोमिलन
अहमदनगर: जिल्ह्याच्या उत्तर भागातील शिर्डी मतदारसंघाची खासदारकी ही सदाशिव लोखंडे यांच्या रुपाने एकप्रकारे दक्षिणेला मिळाली असल्यामुळे उत्तर-दक्षिण मनोमिलनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पडले असल्याचे मानले जात आहे. जिल्ह्याच्या राजकारणात उत्तर-दक्षिण असा वाद बर्याचदा उपस्थित केला जातो. उत्तरेचे नेते दक्षिणेवर अन्याय करतात असाही आरोप होतो. दक्षिण भाग हा मागासलेला असल्यामुळे जिल्हा विभाजन आवश्यक आहे अशी मांडणीही अनेकदा झाली. वास्तविकत: भौगोलिक सीमा न बाळगता या जिल्ह्यात अधिकारी पदांची वेळोवेळी आदानप्रदान झालेली दिसते. बाळासाहेब विखे हे उत्तरेचे रहिवाशी असताना दक्षिणेतूनही ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर अकोले हा आदिवासी मतदारसंघ असतानाही या खात्याचे मंत्रीपद हे बबनराव पाचपुते यांच्या रुपाने दक्षिणेला भूषवायला मिळालेले आहे. आताही शिर्डी मतदारसंघातून मूळचे जामखेडचे सदाशिव लोखंडे विजयी झाले आहेत. २००९ च्या निवडणुकीत रामदास आठवले हे परजिल्ह्यातील आहेत असा प्रचार झाला होता. यावेळी मात्र लोखंडे हे मतदारसंघातील नसतानाही मतदारांनी त्यांना स्वीकारले. मतदारसंघातील रहिवाशी भाऊसाहेब वाकचौरे यांना पराभूत करुन लोखंडे यांना विजयी करण्यात आले. मतदारांनी दक्षिण-उत्तर असा भेद पाळलेला नसल्याचे दिसते. त्यामुळे राजकारणी आता या भेदापासून दूर जाऊन एकसंधपणे जिल्ह्याच्या विकासाबाबत ताकद उभी करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे व मधुकर पिचड हे नेते सध्या मंत्रिमंडळात आहेत. तीनही मंत्रिपदे उत्तरेत व दोन्हीही खासदार दक्षिणेचे असाही एक योग जुळून आला आहे. अर्थात लोखंडे हे जामखेडचे रहिवाशी असले तरी त्यांना आपला निधी मात्र शिर्डी मतदारसंघातच वापरता येणार आहे. (प्रतिनिधी)