महापालिकेला लागेना दूषित पाण्याचा शोध

By Admin | Updated: September 2, 2014 23:29 IST2014-09-02T23:29:46+5:302014-09-02T23:29:46+5:30

अहमदनगर: आगरकरमळा परिसरात दूषित पाणीपुरवठा का होतो, याचा महापालिकेला अद्याप शोध लागलेला नाही़

NMC searches for contaminated water | महापालिकेला लागेना दूषित पाण्याचा शोध

महापालिकेला लागेना दूषित पाण्याचा शोध

अहमदनगर: आगरकरमळा परिसरात दूषित पाणीपुरवठा का होतो, याचा महापालिकेला अद्याप शोध लागलेला नाही़ एक महिना उलटूनही दूषित पाण्याचा शोध सुरूच असून, मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांनी स्टेशन रस्त्यावरील पंचशीलवाडी परिसरात शोध मोहीम राबिवली़ परंतु हाती काहीच न लागल्याने शोध मोहीम गुंडाळण्यात आली़
गेल्या एक महिन्यापासून कावीळ रोगाने स्टेशन रस्ता परिसरात थैमान घातले आहे़ या रोगाने आतापर्यंत दोघांचा बळी घेतला आहे़ हा रोग का व कसा आला,याचा अद्यापही महापालिकेला शोध लागला नाही़ रेल्वेस्टेशन परिसरातील पंचशीलवाडी, अचानक वस्ती, भोवरीचाळ, जयभिम वसाहत, आगरकरमळा आणि संजयनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे़ हे दूषित पाणी पिल्याने नागरिक कावीळ रोगाने त्रस्त असल्याकडे नगरसेवक विजय गव्हाळे यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले़ त्यांनी ही बाब महापालिका आयुक्तांसह सर्वच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली़ मात्र महापालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही़ वारंवार मागणी करूनदेखील एकही अधिकारी तिकडे फिरकला नाही़ याविषयी गव्हाळे यांनी आयुक्तांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली़ तक्रारीचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच मंगळवारी सकाळी महापालिकेचे अधिकारी पंचशीलवाडी परिसरात दाखल झाले़ त्यांनी दूषित पाण्याचा शोध घेतला़ विविध ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन गटारीचे पाणी जलवाहिनीत कसे जाते, याचा शोध घेतला़ तसेच तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून,शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे़
महापालिका प्रशासनाने दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी जलकुंभाची सफाई केली़ परिसरातील गटारी व जलवाहिनी तपासल्या़ परंतु अद्याप याचे कारण महापालिकेच्या पथकाला सापडले नाही़ अनेकवेळा शोध मोहीम हाती घेऊन महापालिकेच्या हाती काहीच लागत नाही़ पण दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींत वाढ होत आहे़ पंचशीलवाडीतील नळांना पिवळे पाणी येत आहे़ या पाण्यात लाल आळ्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़ दूषित पाणीपुरवठा बंद करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली असून, पावसामुळे दूषित पाणी येण्याचे प्रमाण वाढतच आहे़ दूषित पाण्याने साथीच्या रोगांची लागण होत आहे़ ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)
मंगल कार्यालयासमोर पाणी दूषित
औरंगाबाद- पुणे महामार्गावरील एका मंगल कार्यालयासमोर गटारीचे पाणी जलवाहिनीत झिरपते़ मात्र याठिकाणी उपाययोजना न करता दुसरीकडेच शोध मोहीम सुरू आहे़ महापालिकेची शोध मोहीम भरकटल्याने चिंता व्यक्त होत आहे़

Web Title: NMC searches for contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.