ग्रामविकासमंत्र्यांनी घेतला निंबळकचा गृहपाठ
By Admin | Updated: July 6, 2014 00:17 IST2014-07-05T23:06:34+5:302014-07-06T00:17:43+5:30
अहमदनगर : किती वर्षापासून मीटर पद्धतीने पाणी देता? एस.टी. बस, रेल्वे बुकिंग सुविधा आहे का? किती नळ जोड आहेत? बँकिंग सुविधा आहे का? गावचे उत्पन्न किती? अशा एक ना अनेक प्रश्नांची
ग्रामविकासमंत्र्यांनी घेतला निंबळकचा गृहपाठ
अहमदनगर : किती वर्षापासून मीटर पद्धतीने पाणी देता? एस.टी. बस, रेल्वे बुकिंग सुविधा आहे का? किती नळ जोड आहेत? बँकिंग सुविधा आहे का? गावचे उत्पन्न किती? अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी निंबळक (ता.नगर) ग्रामपंचायतीचा गृहपाठ घेतला. तसेच मीटर पध्दतीने पाणी देण्याचे कौतुक केले.
निंबळक येथे महा ‘ई’ संग्राम योजनेमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधाचा आढावा घेण्यासाठी ग्रामपंचायतीचे कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी भेट दिली. यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जगन्नाथ भोर, कालिंदी लामखडे,माधवराव लामखडे, रवींद्र जगताप, अशोक पावडे, विलासराव लामखडे, अशोक पवार, घन:श्याम म्हस्के, उपस्थित होते.
पाटील यांनी सरपंच लामखडे, ग्रामसेवक युवराज ढेरे, संगणक संचालिका रोहिणी रख यांची परीक्षाच घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली. गावात निवडणुका होतात का? किती प्रमाण आहे? मीटर पद्धतीचे पाणी लोकांना परवडते का? गावात किती झाडे लावली? असे प्रश्न विचारून सरपंच व ग्रामसेवकांचा त्यांनी गृहपाठ घेतला. यावेळी पाटील म्हणाले की, या गावात १६०० नळजोड असून, मीटर पद्धतीने पाणीपुरवठा करण्याची पद्धत पथदर्शक आहे.
राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी हिच पद्धत वापरली तर महाराष्ट्र टँकरमुक्त होण्यास वेळ लागणार नाही. तसेच सर्व प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ गावातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोच केला हे कौतुकास्पद आहे असे उद्गारही पाटील यांनी काढले. आता या गावाने पर्यावरण समृद्धीकडे लक्ष देऊन गावाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा संकल्प करावा यासाठी जि.प.च्या वतीने सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले.
काटेकोरपणे तसेच आदर्शपणे काम केल्यामुळे ही ग्रामपंचायत महाराष्ट्रात झळकत आहे. या ग्रामपंचायतीचा आदर्श इतर ग्रामपंचायतीने घेऊन सरकारी योजना आपल्या गावात आणल्या पाहिजे. सरकारी योजना भरपूर आहेत पण त्या राबविण्यासाठी काम करणारी माणसे नसतील तर त्या योजना कागदावरच राहतात. ग्रामपंचायतमधून मिळणाऱ्या सुविधाचा फलक लावल्यामुळे नागरिकांची चांगली सोय झाली. एकाच छत्राखाली २८ प्रकारच्या सुविधा देणारी ही पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, बाळासाहेब कड, बाळासाहेब गायकवाड, प्रदीप सावंत, राजू रोकडे, बबन कदम, संग्राम प्रकल्पाचे निलेश आडकर, हर्षल टाक, समीर पटेल यांच्यासह अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)