मुरुमाने केली जातेय राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST2021-07-29T04:21:33+5:302021-07-29T04:21:33+5:30

अहमदनगर ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हार ते कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुरूमाचा वापर केला जात आहे. थोड्याशा पावसाने ...

Muruma repairs national highways | मुरुमाने केली जातेय राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती

मुरुमाने केली जातेय राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती

अहमदनगर ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हार ते कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुरूमाचा वापर केला जात आहे. थोड्याशा पावसाने या मुरुमाचा चिखल होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नगर-मनमाड हा मार्ग जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून परिचित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक प्रकल्प विभागाच्या माध्यमातून रस्त्याचे बीओटी तत्त्वावर काम झाले होते. प्रशासन आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली. विशेषतः कोल्हार ते कोपरगाव या ६० किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे अनेकांना रस्त्यावर अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. न्यायालयाच्या आदेशाने मार्गावरील टोल वसुलीही बंद करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही रस्त्याचे भाग्य उजळले नाही.

..............

दहा कोटींचा निधी गेला कुठे

कोल्हार ते कोपरगाव या ६० किलोमीटर रस्त्याच्या डागडुजीसाठी दोन ते तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने दहा कोटींचा निधीही दिला होता. जागतिक बँक प्रकल्प विभागाने दुरुस्तीसाठी चार कंत्राटदार नेमून या रस्त्याची दुरुस्ती केली. पण एवढा मोठा निधी मिळूनही रस्त्याची अवस्था फारशी सुधारलेली कुठेच दिसली नाही. या रस्त्यावरील अनेक लहान- मोठे खड्डे तसेच कायम आहेत तर काही ठिकाणी केवळ जुजबी दुरुस्ती केली गेली. मागील महिन्यात आठवडाभर झालेल्या पावसाने पुन्हा रस्त्याचे खरे रूप उघडे पडले. त्यामुळे दहा कोटी कुठे गेले असा सवाल उपस्थित झाला.

.............................

चिखलामुळे अपघात

सद्य:स्थितीत अनेक ठिकाणी खड्डे आहेत. काही ठिकाणी पाणी साचून गटारे झाली आहेत. या रस्त्यावर मुरूम टाकला जात आहे. रिमझिम पावसामुळे या मुरूमाचा चिखल होऊन अपघाताची संख्या वाढली आहे.

..........

दोन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक प्रकल्प बँकेच्या माध्यमातून या रस्त्याच्या डागडुजी दरम्यान अनेक ठिकाणी दुरुस्ती केली. काही ठिकाणी साईड गटारांचे, साईडपट्ट्यांचे काम केले गेले. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे.

-रवींद्र चौधरी, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोपरगांव

..............

कोल्हार ते कोपरगाव रस्त्यासाठी राज्य सरकारने दहा कोटींचा निधी दिला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग जागतिक प्रकल्पाच्या अंतर्गत केवळ तात्पुरती मलमपट्टी केली गेली. आता रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविले जात आहेत. मिळालेल्या निधीचा योग्य विनियोग झालेला नसून ठरावीक कंत्राटदारांचे चोचले पुरविल्या गेल्याने हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनत आहे.

-राजेद्र निर्मळ, राहाता तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस.

270721\2440img-20210727-wa0146.jpg

नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाची डागडूजी चक्क मुरूमाने...अपघातांचा धोका वाढला.दोन महिन्यापुर्वी खर्च केलेले दहा कोटी गेले पाण्यात 

Web Title: Muruma repairs national highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.