एमआयडीसीत अंधार, शहरात पाण्याची वानवा
By Admin | Updated: June 7, 2014 00:18 IST2014-06-06T23:15:14+5:302014-06-07T00:18:30+5:30
अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात झालेल्या वादळाने महावितरणची दाणादाण उडाली आहे़
एमआयडीसीत अंधार, शहरात पाण्याची वानवा
अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात झालेल्या वादळाने महावितरणची दाणादाण उडाली आहे़ शहर परिसरातील विद्युत खांब कोसळले असून, जिल्ह्यातील रोहित्रे पडल्याने विद्युतपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे़ त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत़
शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे़ मान्सूनपूर्व पावसाचा मुक्काम वाढला आहे़ सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी रात्री शहर परिसरातील, नागापूर औद्योगिक वसाहत, बोल्हेगाव, सावेडी, नालेगाव, दिल्लीगेट परिसर आणि औरंगाबाद महामार्ग परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला़ त्यामुळे या परिसरातून मुळा धरणाकडे जाणाऱ्या विद्युत तारा तुटल्या, खांब कोसळले़ मनमाड महामार्गावर झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने काहीवेळ वाहतूकही ठप्प झाली होती़ या परिसरातून विद्युत पुरवठा होत असलेल्या गुलमोहर रस्ता, पाईपलाईन रस्ता, भिस्तबाग चौक परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता़ नालेगाव येथील उसाच्या मळ्यातील रोहित्र विजेच्या गडगडाटामुळे नादुरुस्त झाले होते़ ते पहाटे दुरुस्त करण्यात आले़ मात्र दिल्लीगेट, औरंगाबाद महामार्ग आणि सावेडी परिसरात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा होऊ शकला नाही़ त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला़
मुळा धरण व एमआयडीसीतील विद्युतपुरवठा एकाचवेळी खंडित झाला़ महावितरणच्या वतीने दुरुस्तीचे काम रात्री उशिराने हाती घेण्यात आले़ रात्री खंडित झालेला वीजपुरवठा पहाटे चार वाजेच्या सुमारास पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले़ नगर तालुका परिसरात वादळी वाऱ्याच्या तडाख्याने विद्युत खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला़ जिल्ह्यातील शेवगाव, पारनेर, पाथर्डी आणि नेवासा तालुक्यातील विविध गावांत १७० विद्युत खांब पडले़ त्यामुळे वाड्या-वस्त्यांवरील वीजपुरवठा खंडित झाला असून, तो अद्यापही सुरु करण्यात आला नाही़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़
वाड्या वस्त्या अंधारात
वादळाच्या तडाख्याने रोहित्र पडले आहेत़ जिल्ह्यातील १० रोहित्र पडल्याने वाड्या वस्त्यांवरील विद्युत पुरवठा खंडित झाला़ तो दुरुस्त करण्याची मोहीम महावितरणच्या वतीने हाती घेण्यात आली आहेग़ावांतील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे़ मात्र वाड्या- वस्त्या अजूनही अंधारातच आहेत़
दिवसभरात ५०० तक्रारी
रात्री शहरातील विविध परिसरातील विद्युत खांब पडले़ ताराही तुटल्या आहेत़ त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला़ नागरिकांनी याबाबत महावितरण कार्यालयात दूरध्वनी करून माहिती दिली़या तक्रारींची दखल घेऊन दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे़शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या घराजवळच खांब वाकून तारा लोंबकळत होत्या. त्या तातडीने ओढण्यात आल्या.
जिल्ह्यात १९३ वीज वाहक खांब जमिनीवर...
एमआयडीसीतील रोहित्र
मुळा धरणाचे रोहित्र
जिल्ह्यातील १० रोहित्र पडले
नागापूर-२, बोल्हेगाव-२, पाईपलाईन- ७, नगर तालुका-२२, दिल्लीगेट-२,औरंगाबाद महामार्ग-४, सावेडी-२
जिल्ह्यात १९३ खांब पडले
पारनेरसह, शेवगाव, नेवासा आणि पाथर्डी तालुक्यात १९३ विद्युत खांब पडले़ त्यामुळे या तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला़
अहमदनगर: मुळानगर आणि विळद परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गुरूवारी रात्री ९ तास वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. पाणी योजनेचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी महापौर संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मंगळवारपासून गुरूवारपर्यंत शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी सुरू होती. वादळाने तांत्रिक बिघाड निर्माण होऊन पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा सारखा खंडित होत आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे.
मंगळवारी कोसळलेल्या जोरदार पावसाने वसंत टेकडी येथे पाणी पुरवठा योजनेला वीज पुरवठा करणारी वाहिनी तुटली. बुधवारी सायंकाळपर्यंत दुसरी वाहिनी टाकून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्याच रात्री पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे मुळानगर व विळद येथील वीज पुरवठा रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत खंडित झाला. त्यामुळे पाणी उपसा बंद झाला. पर्यायाने शहराला पाणी पुरवठा झाला नाही. दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असता गुरूवारी रात्री पुन्हा वादळी पाऊस पडला. सायंकाळी ७ ते पहाटे ४ वाजेपर्यंत मुळानगर येथील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुळा धरणातून पाणी उपसा होऊ शकला नाही. चार वाजता वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणी उपसा सुरू झाला. पण त्यानंतर पुन्हा ७ वाजेच्या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पुन्हा व्यत्यय आला.
दि. ३ जूनपासून वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने संपूर्ण शहरासह उपनगराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. विस्कळीत झालेला पाणी पुरवठा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पूर्वपदावर आणण्याच्यादृष्टीने महापालिका शर्थीने प्रयत्न करत आहे. परंतु सातत्याने खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण होत आहे. महापौर संग्राम जगताप व आयुक्त विजय कुलकर्णी यांनी पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. तसेच विजेचा हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडेही मांडला आहे. पाण्याची ही गंभीरस्थिती लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे