मर्सिडीज बेंझ कंपनीला नगरमध्ये येण्याचे निमंत्रण
By Admin | Updated: July 16, 2014 00:44 IST2014-07-15T23:29:29+5:302014-07-16T00:44:57+5:30
अहमदनगर: जगप्रसिध्द व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित मर्सिडीज बेंझ कंपनीला नगर एमआयडीसीत मोठा उद्योग प्रकल्प उभारणीचे निमंत्रण दिले आहे.
मर्सिडीज बेंझ कंपनीला नगरमध्ये येण्याचे निमंत्रण
अहमदनगर: जगप्रसिध्द व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित मर्सिडीज बेंझ कंपनीला नगर एमआयडीसीत मोठा उद्योग प्रकल्प उभारणीचे निमंत्रण राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिले आहे. कंपनी प्रकल्प उभारण्याबाबत सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन कंपनीचे कॉपोरेट अफेअर्स व्हाईस पे्रसिडेंट सुहास कडलसकर यांनी दिले.
चाकण येथे कडलसकर यांची काळे यांनी भेट घेतली. जवळपास अर्धा तास काळे यांनी कडलसकर यांना नगर एमआयडीसीची माहिती दिली. नगरमधील तरूण उच्चशिक्षित असून त्यांच्याकडे उद्योग क्षेत्रासाठी लागणारी कौशल्य आहेत. मर्सिडीजचा प्रकल्प नगरला आला तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. शहरातील लघु उद्योगांना चालना मिळेल, असे काळे यांनी त्यांना सांगितले. या भेटीनंतर बोलताना कडलसकर म्हणाले, गत अनेक वर्षापासून कंपनीचा चाकण येथे मोठा प्रकल्प सुरू आहे. कंपनी स्थानिक युवकांना नेहमीच प्राधान्य देत असते. भविष्यात नगर एमआयडीसीमध्ये प्रकल्प उभारणीसाठी मर्सिडीज बेंझ कंपनी निश्चित विचार करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शहरातील बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतुने राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.त्याचाच हा भाग असल्याचे काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बजाजसाठीही प्रयत्नशील
शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भारत व जगातील नामांकित कंपन्यांना नगर एमआयडीसीत प्रकल्प उभारणीबाबत निमंत्रण दिले आहे. जनरल मोटर्स, वोक्स वॅगन, टाटा या कंपन्यांशी काळे यांचा संपर्क झाला आहे. बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचीही ते भेट घेणार असून त्यांना नगरमध्ये प्रकल्प उभारणीसाठी निमंत्रण देणार आहेत.
हा तर त्यांचा खोटा आभास...
स्थानिक लोकप्रतिनिधीने भावनिक राजकारण करून नगरकर व इथल्या उद्योगधंद्यांना संरक्षण देऊ शकतो असा खोटा आभास निर्माण केला. गत २५ वर्षात एकाही उद्योजकाची, आंतरराष्ट्रीय कंपनीच्या व्यवस्थापनाची भेट घेतली नाही. त्यासाठी पाठपुरावा केला नाही. विकासाची दृष्टी नसलेल्या लोकप्रतिनिधीच्या निष्क्रिय कारकिर्दीला घरघर लागल्याची टीका किरण काळे यांनी केली.