श्रीगोंदा : शहरातील मेन रोड ते सावरकर चौकाला जोडणाऱ्या गवळी गल्ली रस्त्याची अवस्था अगदी शोचनीय झाली आहे. संतप्त नागरिकांनी नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्षा मनीषा लांडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना भेटून तुम्ही शहरात कोट्यवधींचा खर्च केला. आमचा रस्ता का होत नाही? रस्ता करा अन्यथा १३ सप्टेंबरपासून पालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला.
शहरात उपनगरातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु, शहरातील प्रभाग क्र. ६ मधील मध्यवर्ती असलेल्या गवळी गल्ली रस्त्यावर निधी मंजूर नसताना हा रस्ता करण्यासाठी ठेकेदाराने खोदला आणि त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली.
मेन रोड ते सावरकर चौकाला जोडणारा हा रस्ता महत्त्वाचा असून शहरातील प्रसिद्ध रेणुकामाता मंदिर याच रस्त्यावर आहे. मंगळवार पौर्णिमा या दिवशी भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. शिवाय नवरात्रौत्सवदेखील तोंडावर आहे. त्यामुळे रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.
संदेश गांधी, बापू अवसरे, हरिभाऊ काळे, चंद्रकांत भुते, बाबूराव हिरणावळे, संतोष बोरा, हिरामण हिरणावळे, प्रकाश भुते, दीपक हिरणावळे, माणिक विश्वकर्मा, अशोक महामुनी, अजित पंडित, चांदेकर काका, माणिक हिरणावळे, सुहास तरटे, श्रीपाद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, अमोल हिरणावळे, महेश खोत, ॲड. विनायक भुते, ऋषिकेश भुते, शुभम हिरणावळे, महेश पवार आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.