लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात वाढली गुन्हेगारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:47+5:302021-06-23T04:14:47+5:30
राज्यात २०२० या वर्षात नगर जिल्हा गुन्हेगारीत अव्वल ठरला होता. गुन्ह्यांचे वर्गीकरण करून दाखल असलेल्या गुन्हेगारीची आकडेवारी नुकतीच सादर ...

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात वाढली गुन्हेगारी
राज्यात २०२० या वर्षात नगर जिल्हा गुन्हेगारीत अव्वल ठरला होता. गुन्ह्यांचे वर्गीकरण करून दाखल असलेल्या गुन्हेगारीची आकडेवारी नुकतीच सादर झाली होती. त्यात जिल्ह्यात तब्बल ३८ हजार ८१६ गुन्ह्यांची नोंद आढळून आली होती. जिल्ह्यात ३ हजार २०० कर्मचारी नेमणुकीस असून ३० पोलीस ठाणे कार्यरत आहेत. मात्र ही सर्व यंत्रणा गुन्हेगारी रोखण्यास तोकडी पडत आहे.
कोविड संकटामुळे भुरट्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किराणा मालाची दुकाने लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. जबरी चोरीच्या घटना कमी झाल्या असल्या तरी हाताला काम नसल्याने काही प्रवृत्ती चुकीच्या मार्गाला वळल्या आहेत.
------------
वाढीव पोलीस बळाचे काय?
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी नगर जिल्ह्यासाठी ५०० कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र गृह विभागाकडून त्यावर काय कार्यवाही झाली हे मात्र समजू शकलेले नाही.
------------
किरकोळ वादाचे प्रकार वाढले
कोविडमुळे बाहेरगावावरून गावी आलेल्या लोकांचे त्यांच्या कुटुंबीयांशी किरकोळ कारणांवरून वाद वाढले आहेत. रिकाम्या वेळातून अशा प्रकारच्या घटना होत आहेत. घराच्या अंगणात समोरासमोर आले तरी भांडणे होण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाहीत.
- डॉ. दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर
----------
खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार
जिल्ह्यातील पोलीस दलात खबऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. तपासालाही मर्यादा आल्या आहेत. पुढील काळात खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार आहे.
----------
लॉकडाऊनमुळे ज्या लोकांसमोर जगण्याचेच आव्हान उभे राहिले आहे, अशा लोकांमध्ये नैतिक मूल्य रुजविण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. मात्र त्यांना समुपदेशन करून उपयोग नाही. कारण पैशांविना ते जगणार कसे? हा मुख्य प्रश्न आहे.
- डॉ. विक्रांत खैरनार, मानसोपचारतज्ज्ञ, श्रीरामपूर
------------