झावरे-दाते समर्थकांची शाब्दिक चकमक
By Admin | Updated: June 24, 2014 00:03 IST2014-06-23T23:32:18+5:302014-06-24T00:03:04+5:30
अहमदनगर: जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत डावलल्याच्या कारणावरून जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे व बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते समर्थकांत शाब्दिक चकमक उडाली.
झावरे-दाते समर्थकांची शाब्दिक चकमक
अहमदनगर: जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत डावलल्याच्या कारणावरून जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे व बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते समर्थकांत शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने राष्ट्रवादी भवनाबाहेर तणाव निर्माण झाला. पण पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनी दोन्ही गटाला शांत केल्याने तणाव निवळला.
जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग अभंग यांच्या नावाची घोषणा होताच दाते समर्थक वसंत चेडे, चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर यांच्यासह अन्य समर्थकांनी घोषणाबाजी करत सभागृह सोडले. दरम्यान सुजित झावरे यांच्या पक्ष कार्यालयासमोर पक्ष व सुजित झावरे यांच्या निषेधाच्या घोषणाबाजी देत कार्यालयाबाहेर गडबड गोंधळ घालण्यास सुरूवात केली.
झावरे यांच्या नावाचा निषेध सुरू असल्याचे समजताच सभागृहातून सुजित झावरे बाहेर आले. ते थेट दाते समर्थकांच्या जमावात घुसले. दीपक नाईक, सचिन शेळके, योगेश मते व इतर झावरे समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने घोषणाबाजी बंद झाली. मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या वेळी डावलले त्यावेळी तालुक्यातील तुम्ही कुठे होता असा सवाल करत झावरे यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना भानावर आणले. काशिनाथ दाते यांनीही त्यांच्या समर्थकांना शांत केले.
दादा कळमकर यांनी झावरे यांना दाते समर्थकांच्या कोंडाळ्यातून बाहेर नेले. त्यानंतर तणाव निवळला.
(प्रतिनिधी)
पक्षाचे काम करणार नाही
पक्ष कार्यालयाबाहेर जमलेल्या दाते समर्थकांनी पक्षाचा निषेध करून यापुढे पक्षाचे काम पारनेरमध्ये करणार नसल्याचे जाहीर केले. पक्षासाठी कोणाच्याही दबावाला बळी न पडता लोकसभा निवडणुकीत पक्षाचे निष्ठेने काम केले. पक्षाने मात्र दाते यांचे नाव जाहीर करून नंतर जिल्हाध्यक्षपदाची संधी दुसऱ्यालाच दिली. पक्षाने दाते यांचा अपमान केला असून पक्षाला त्याची किंमत मोजावी लागेल. पक्षाचे काम यापुढे पारनेर तालुक्यात करणार नसल्याची घोषणा तेथेच संतप्त दाते समर्थकांनी केली.
स्वाभिमान होता तर यापूर्वीच का नाही गेले!
अहमदनगर: स्वाभिमानातूनच राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाला आहे. पक्ष स्वाभिमान जपून आहे. येथे प्रत्येकाला स्वाभिमान दिला जातो. पक्ष सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या घनशाम शेलारांना पक्षाने भरभरून दिले. ज्यांना स्वाभिमान नाही त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नये, असा टोला पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी शेलार यांना लगावला.
पालकमंत्री मधुकर पिचड, आमदार चंद्रशेखर घुले, अरुण जगताप, महापौर संग्राम जगताप, माजी आमदार प्रसाद तनपुरे, प्रताप ढाकणे, दादा कळमकर, विक्रम पाचपुते, निर्मला मालपाणी, बाळासाहेब जगताप, काका नरवडे, अजित कदम, राजेंद्र फाळके, मेधा कांबळे, सुजित झावरे, बाबासाहेब भोस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा राष्ट्रवादी भवनात झाला. त्यावेळी ते बोलत होते. तत्कालीन जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी संघटना उभी केली. ती नंतर शेलार यांच्या हातात दिली.
लोकसभा निवडणुकीनंतर स्थान दिले जात नाही असे वाटणारे शेलार त्याचवेळी का नाही गेले. त्यांना पदावरून हटविण्याची चर्चा अनेकदा झाली. पण पक्षनेतृत्वाने त्यांना संधी दिली. त्यांनीच आता स्वाभिमानाच्या गप्पा मारून जाणे याबद्दल काकडे यांनी आश्चर्य व्यक्त केले. राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या शेलार यांना एस.टी.महामंडळाचे संचालक, प्रदेश सरचिटणीस, पिंपरी चिंचवडचे पक्ष निरीक्षक, विरोध असतानाही दोनदा जिल्हाध्यक्षपद दिले. कोणी पक्ष सोडून गेले तर पक्ष थांबत नाही. प्रदेश पातळीवर जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय झालेला असून तो अंतिम आहे. सर्वांनी तो मान्य करून विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन काकडे यांनी केले. संदीप वर्पे यांनी सूत्रसंचालन केले.
(प्रतिनिधी)
एक नेता, एक घर, एक निर्णय...
संघटना मजबूत ठेवयाची असेल तर पक्षाने ‘एक नेता, एक घर, एक निर्णय’ हे सूत्र स्वीकारले असल्याचे पालकमंत्री मधुकर पिचड यांनी सांगितले. ज्यांना नगरपालिका, महापालिका चालविता येत नाही त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर केले असे सांगत सेना, मनसेवर टीका करत ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हा आघाडीचा फॉर्म्युला असल्याचे पिचड यांनी सांगितले. येथे लायकी व कर्तृत्वानुसार पदे वाटप केली जातात. नवा-जुना असा कोणताही वाद पदवाटपात येत नाही. गैरसमज पसरविणारे पक्षात असतील तर त्यांना घरचा रस्ता दाखविला जाईल असा इशाराही पिचड यांनी दिला. राजकारणात वजाबाकी चालूच असते. त्याचा विचार करू नका, असे सांगत पिचड यांनी कार्यकर्त्यांना संजीवनी दिली.