निळवंडे लाभक्षेत्र लवकरच छावणी मुक्त करू : खासदार सदाशिव लोखंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:36 IST2019-06-10T13:35:19+5:302019-06-10T13:36:10+5:30
अवर्षण प्रवण भागासाठी निळवंडेची निर्मिती करण्यात आली. मात्र गेली ४८ वर्षे या प्रश्नाचे राजकारण करण्यात आले. निळवंडेचे कालवे झालेले असते तर आज जनावरे छावणीत आणण्याची गरजच पडली नसती.

निळवंडे लाभक्षेत्र लवकरच छावणी मुक्त करू : खासदार सदाशिव लोखंडे
तळेगाव दिघे : अवर्षण प्रवण भागासाठी निळवंडेची निर्मिती करण्यात आली. मात्र गेली ४८ वर्षे या प्रश्नाचे राजकारण करण्यात आले. निळवंडेचे कालवे झालेले असते तर आज जनावरे छावणीत आणण्याची गरजच पडली नसती. आपली खासदारकी पणाला लागली तरी चालेल, मात्र निळवंडेचे पाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. निळवंडे लाभक्षेत्र लवकरच चारा छावणी मुक्त करू, असे आश्वासन शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे संगमनेर दुध संघामार्फत चालविण्यात येणा-या जनावरांच्या चारा छावणीस रविवारी दुपारी शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी भेट दिली. प्रसंगी शेतक-यांशी संवाद साधताना ते बोलत होते. शिवसेनेचे तळेगाव गटाचे नेते पंढरीनाथ इल्हे, मच्छिंद्र दिघे, संग्राम जोंधळे, सागर भागवत, बाळासाहेब दिघे, अर्जुन शिरसाठ, सतिष मुळे, नामदेव दिघे, शिवाजी सुपेकर, विजय शिंदे उपस्थित होते.
आपण राज्याची सुधारित प्रस्तावित मान्यता मिळवण्यापासून ते केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. निळवंडेबाबत कधीही राजकारण केले नाही. अकोल्यातील कामे चालू करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून लवकरच ती कामे सुरु होतील. संगमनेर तालुक्यात शिवसेनेला मिळालेले मताधिक्य पाहून काँग्रेसच्या नेत्यांना निळवंडे आता आठवत आहे. मात्र यांचे निळवंडे प्रेम बेगडी आहे. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता निळवंडेचे पाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. निळवंडेच्या कालव्याच्या कामासाठी जो कोणी राजकारण विरहित पुढाकार घेईल, त्याचे स्वागत आहे. मात्र राजकारण करणा-यांना जनता थारा देणार नाही. निळवंडे लाभक्षेत्र लवकरच छावणी मुक्त करू, अशी ग्वाही खासदार लोखंडे यांनी देत चारा छावणीच्या भेटी दरम्यान जनावरांची संख्या, मिळणारा चारा याबाबत माहिती घेतली.
रामनाथ दिघे, संजय कदम, तुकाराम दिघे, शिवाजी दिघे, सचिन विठ्ठल दिघे, विजय शिंदे, संजय कवाडे ज्ञानदेव दिघे, रामचंद्र कडनर, राजेंद्र रोकडे, किरण दिघे, किसन गडाख, सोपान कडनर, मंजीराम जगताप सहित पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.