कनोली गावाला ‘केबीसी’चा विळखा
By Admin | Updated: July 24, 2014 00:19 IST2014-07-23T23:35:13+5:302014-07-24T00:19:50+5:30
रियाज सय्यद/योगेश रातडिया ल्ल संगमनेर महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची झोप उडवून देणाऱ्या ‘केबीसी’ मल्टीट्रेड कंपनीची पाळेमुळे नगर जिल्ह्यातही रूजली
कनोली गावाला ‘केबीसी’चा विळखा
रियाज सय्यद/योगेश रातडिया ल्ल संगमनेर
महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची झोप उडवून देणाऱ्या ‘केबीसी’ मल्टीट्रेड कंपनीची पाळेमुळे नगर जिल्ह्यातही रूजली असून कनोली (ता. संगमनेर) या संपूर्ण गावाची सुमारे ३० कोटींची लुबाडणूक झाल्याचे समोर आले आहे.
नाशिकला भाऊसाहेब चव्हाण याने ‘केबीसी’ नावाची कंपनी ‘लाँच’ केली. जवळचे नातेवाईक, मित्र, संबंधातील ‘एजंट’ बनविले. त्यांच्याकरवी सर्वसामान्य लोकांकडून पैसे गोळा करून मुदत ठेवीच्या पावत्या वाटल्या. केवळ तीन महिन्यात पैसे दामदुप्पट करून देण्याच्या अभिनव योजनेला अनेकजण बळी पडले. एजंटांच्या माध्यमातून खेड्या-पाड्यातून ‘केबीसी’त लाखो रुपयांची गुंतवणूक झाली. प्रवरा नदी काठावरील सुमारे ४ हजार ५०० लोकसंख्येचे कनोली गावही ‘केबीसी’च्या फसवेगिरीत अडकले. ऊस, टोमॅटो, वांगी आदी नगदी पिके घेऊन शेतकऱ्यांनी चार पैसे गाठीला बांधले. ४ वर्षांपूर्वी या गावात केबीसीने शिरकाव केला. पैशाच्या मोहापायी अनेकांनी यात गुंतवणूक केली. ‘केबीसी’ कंपनी बुडाली तर आमची जमीन विकून पैसे देवू. २०१४ मध्ये कनोली गावात पैशांचा पाऊस पडणार आहे.
पोत्यात भरून पैसे आणू. या एजंटांच्या भूलथापांना बळी पडून ९७ टक्के गाव ‘केबीसी’च्या जाळ्यात अडकले. सुरूवातीला पैसे मिळाले. विश्वासार्हता वाढल्याने कुणी मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले, तर कुणी म्हातारपणाची पुंजी म्हणून ठेवलेले, कुणी जमीन विकून, कुणी सगे-सोयऱ्यांकडून आणून, कुणी दागिने मोडून-तोडून, गहाण ठेवून पैसे ‘केबीसी’त भरले.
परंतु आता ‘केबीसी’चे पितळ उघडे पडल्याचे समजताच कनोलीवर आभाळच कोसळले आहे. भरलेले पैसे बुडालेल्या गुंतवणूकदारांचे डोळे पांढरे झाले आहेत.
सुनील वर्पे या शेतकऱ्याने एक एकर जमीन विकून ५ लाख ३९ हजार, मंगेश सुदाम वर्पे या शेतकऱ्याने १ लाख ३६ हजार, नोकरदार थॉमस रामचंद्र जगताप यांनी १७ हजार २००, शेतमजूर श्रीकांत रघुनाथ वर्पे यांनी ८६ हजार रुपये अंदाजे १५ ते २० एजंटांद्वारे गुंतविण्यात आले आहेत.
(प्रतिनिधी)
एजंटाच्या भूलथापांना बळी पडून मी टाकळी (ता.अकोले) येथील एक एकर जमीन विकून ५ लाख ३९ हजार रूपये ‘केबीसी’त भरले. दोन महिन्यांपूर्वी एजंटाने पावत्या घेवून पहिला हप्ता काढून आणला. मात्र पैसे दिलेच नाहीत. फसवणूक करणाऱ्या एजंटाला अटक करा.
- सुनील वर्पे, शेतकरी
मी ‘केबीसी’त १ लाख ३६ हजार रूपये गुंतविले. आता एजंटाकडे पैशांची मागणी केली तर कंपनी बुडाली, मी काय करू? वाटलं तर मला फाशी द्या, असे तो सांगतो.
- मंगेश वर्पे,
शेतकरी
‘केबीसी’त फसवणूक झालेल्या सुनील वर्पे यांनी एजंट रामहारी निवृत्ती वर्पे व बाळासाहेब काशिनाथ पोखरकर यांच्याविरूध्द आश्वी पोलिसात तक्रार दिली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग व वरिष्ठांशी चर्चा करून सबळ पुरावे मिळाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करू.
- सुनील पवार, सहाय्यक निरीक्षक